राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. पुन्हा कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. त्यामुळे आता राज्याची वाटचाल लॉकडाऊनकडे होत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे नागरिकांच्या आणि प्रशासनच्या चिंतेत मात्र भर पडली आहे. राज्यात मागील २४ तासात १५,६०२ नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ७,४६७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २१,२५,२११ करोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.४९% एवढे झाले आहे.
मागील २४ तासात राज्यात ८८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.३ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७४,०८,५०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,९७,७९३ (१३.२० टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर सध्या राज्यात ५,७०,६९५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ५,०३१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २२,९७,७९३ झाली आहे.
राज्यातील पुणे, मुंबई, अकोला, औरंगाबाद, यवतमाळ, अमरावती, नागपूरमध्ये कोरोना पुन्हा फोफावला आहे. पुण्यामध्ये रात्रीची संचारबंदी करण्यात आली आहे. तर औरंगाबादमध्येही कडक निर्बंध लागू करण्यात आली आहे. कोरोना प्रभावित राज्यांमध्ये ३१ मार्चरपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नाशिकमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने कडक निर्बंध लागू करण्यात आली आहे. तसेच संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांता कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन मुंबईतही लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. परंतु राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये अंशता लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊन टाळायचा असेल तर कोरोना नियमांचे काटेकोर पालन करा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.