“काही तीन लोकांना असं वाटतं की तीन तिघाडा काम बिघाडा. महाराष्ट्रात तीन पक्षाचं एक सरकार आहे. हेच ब्रम्ह-विष्णू-महेशाचे सरकार” असल्याचं वक्तव्य विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. स्वातंत्र्यसैनिक सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात आणि हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त संगमनेर येथे ते बोलत होते. या सरकारने सुरुवातीलाच शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विविध क्षेत्रात काम करत असताना तिन्ही पक्षांच्या नेत्यांचा हा सत्कार सोहळा असल्याचीही भावना पटोले यांनी व्यक्त केली.
बडबड कमी आणि काम जास्त या नाऱ्यातून काम करायचं आहे. महाराष्ट्राचं अलीकडचं सरकार नक्कीच चांगलं काम करतील हे माझं आश्वासन आहे. राजकारणातील आक्रमक व्यक्तिमत्व म्हणून माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन असला तरी मी जनतेचा प्रतिनिधी आहे. हे सरकार जनतेच्या विश्वासाला निश्चित पात्र ठरुन पाच वर्षे सत्तेत राहणार असल्याचा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.
This 3-party #Maharashtra govt is like Brahma, Vishnu, Mahesh. It will complete its full 5-year term: Assembly Speaker Nana Patole
— Press Trust of India (@PTI_News) January 12, 2020
यावेळी, पटोले यांनी बाळासाहेब थोरात यांच्याबाबतही गौरवोद्गार काढले. शेतीप्रधान देशातील नागरिकांच्या हिताचे नियम आणि कायदे बनवण्यासाठी विधानसभा आणि लोकसभेत शेतकऱ्यांची मुले गेली पाहिजेत. विधानसभा अध्यक्ष म्हणून मी बाळासाहेबांना पाठींबा देणार आहे. पण, त्यांनी जनतेचे प्रश्न कॅबिनेटमध्ये मांडले पाहिजे. जनतेच्या प्रश्नांवर जर न्याय मिळाला नाही तर सरकारला ही आम्ही धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका आम्ही आधीच स्पष्ट केली आहे.
बाळासाहेब थोरात यांच्या रुपाने महाराष्ट्राला एक जबाबदार व्यक्तीमत्व मिळाले आहेत. त्यामुळे त्यांनी जास्त ताकदीनिशी जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडले पाहिजेत असं ही आपुलकीचं आवाहन नाना पटोले यांनी बाळासाहेब थोरात यांना केलं आहे. महाराष्ट्राचे चार तुकडे करण्याचा प्रस्ताव कोणीतरी दिला आहे. पण, आता चार तुकडे करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असंही पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.