राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव निय़ंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने आणखी कठोर निर्बंधांची घोषणा केली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांकडून त्यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार खासगी प्रवासी वाहतूकीत क्वारंटाईन नियम काय? क्वारंटाईन कालावधी किती असणार? सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय कोणाला? लग्न समारंभाचे नवे नियम काय? याकरता आज रात्री ८ वाजेपासून पासून राज्यातील निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून ब्रेक द चेन अंतर्गत अधिक कडक निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. हे निर्बंध २२ एप्रिल ते १ मे पर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत आज रात्री ८ वाजल्यापासून लागू होणारी सुधारित नियमावली प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली असून ती खालील प्रमाणे..
🚨New strict restrictions under #BreakTheChain🚨
To be implemented from 22nd April 2021, 8pm onwards pic.twitter.com/ifyrcQCbnH
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 21, 2021
जाणून घ्या, ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत असणारी नवी नियमावली
सार्वजनिक प्रवासी वाहतूक
- केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेन, मोनो रेल, मेट्रोने प्रवास करण्यास मुभा असणार आहे. सरकारी कर्मचारी असले तरी प्रवासासाठी शासनाद्वारे त्यांना देण्यात आलेलं ओळखपत्र त्यांच्या जवळ असणे बंधनकारक असणार आहे.
- सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनासुद्धा लोकलने प्रवास करता येणार आहे. यामध्ये पॅरामेडिकल स्टाफ, डॉक्टर्स, नर्सेस, मेडिकल क्लिनिक स्टाफ यांना लोकल, मेट्रो, मोनो रेलने प्रवास करण्यास मुभा असेल. सर्व वैद्यकीय अधिकारी- कर्मचारी यांना त्यांच्या वैद्यकीय संस्थेने दिलेल्या ओळखपत्राच्या आधारे तिकीट आणि पासेस मार्फत प्रवास करता येणार
- ज्या व्यक्तीला उपचार तसेच आरोग्य विषयक मदत हवी असेल त्यांना सुद्धा प्रवास करता येणार आहे. रुग्णासोबत फक्त एकाच व्यक्तीला प्रवास करता येणार आहे.
लग्न समारंभासाठी नवे निर्बंध
- लग्न समारंभासाठी अवघ्या २५ लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा उरकावा लागणार आहे. इतकच नाही तर अवघ्या २ तासांत तुम्हाला लग्नाचे सर्व विधी आणि अन्य कार्यक्रम पार पाडणं बंघनकारक आहे.
- या नियमांचं पालन केलं नाही तर तब्बल ५० हजार रुपयांचा दंड कुटुंबांना ठोठावला जाईल. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात लग्न करायचं झाल्यास तुम्हाला सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करणं गरजेचं आहे.
क्वारंटाईनचे नवे नियम काय?
- नव्या नियमावलीनुसार एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करायचा असेल तर तुमच्याकडे महत्त्वाचे कारण असणं गरजेचं आहे. इतकंच नाही तर त्यासाठी स्थानिक प्रशासनाची मंजुरी घेणं गरजेचं आहे.
- तुम्ही लांब पल्ल्याचा प्रवास करुन जाणार असाल तर तुम्हाला १४ दिवस होम क्वारंटाईन राहावं लागणार आहे.
- जीवनावश्यक सेवेची पूर्तता किंवा वैद्कीय आपत्कालीन प्रसंग वा अंत्यसंस्कार आणि कुटुंबातील कोणी गंभीर आजारी असणे यासारख्या परिस्थितीत आंतरजिल्हा आंतरशहर प्रवासाला परवानगी देण्यात येईल. या आदेशांचा भंग करणाऱ्यांना दहा हजार रुपये दंड आकारण्यात येईल.
कार्यालयीन उपस्थिती किती राहणार?
- सर्व सरकारी कार्यालयांमध्ये केवळ १५ टक्के कर्मचारी हजर राहू शकणार. यात केवळ कोरोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट असेल. इतर सर्व कार्यालयांमध्ये ५ कर्मचारी किंवा १५ टक्के कर्मचाऱ्यांनाच हजर राहता येणार.
- अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार. मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी १०० टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येणार
- मंत्रालय तसेच मुंबई महानगर प्रदेशातील सरकारी कार्यलयांसंदर्भात महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीने विभागप्रमुख १५ टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचारी हजेरीबद्दल निर्णय घेऊ शकतील.
- इतर सरकारी कार्यालयांसदर्भात विभागप्रमुख जास्तीच्या उपस्थितीबद्दलचा निर्णय स्थानिक आपत्ती व्यावस्थापन प्राधिकरणांच्या परवानगीने घेऊ शकतील.