राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालांची धूम असताना प्रत्येक पक्ष आपण जिंकलेल्या ग्रामपंचायतींचं समीकरण जुळवण्यात व्यस्त आहे. विशेषत: सत्ताधारी आणि विरोधकांकडून यासंदर्भात दावे केले जात आहेत. पण या सगळ्या गोंधळात मनसे फॅक्टरकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. मनसे नेते राज ठाकरेंनी घोषणा केल्यानुसार मनसेनेही ग्रामपंचायत निवडणुका लढवल्या होत्या. यामध्ये मनसेला सकारात्मक निकाल दिसू लागले असून चक्क सत्ताधारी शिवसेनेलाही मनसेनं धक्का दिला आहे. शिवसेनेची तब्बल २५ वर्षांची सत्ता उलथवून तिथे मनसेचा झेंडा फडकावण्यात मनसे कार्यकर्त्यांना यश आल्यामुळे मनसेचा उत्साह वाढण्यास मदत होणार आहे.
शिवसेनेला केलं चारीमुंड्या चीत!
राज्यात १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धुरळा उडाला असून बुलढाण्याच्या जिगाव ग्रामपंचायतीमध्ये मात्र मनसेच्या घोषणा होऊ लागल्या आहेत. कारण जिगाव ग्रामपंचायतीमधल्या ९ पैकी ७ जागा जिंकत ही ग्रामपंचायत मनसेनं खिशात घातली आहे. स्थानिक तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर कांडेलकर यांनी शिवसेनेच्या ताब्यात २५ वर्षांपेक्षा जास्त काळ असलेली ही ग्रामपंचायत जिंकण्यासाठी कंबर कसली होती. अखेर ही ग्रामपंचायत मनसेनं खिशात घातली आहे.
१५ ग्रामपंचायती मनसे जिंकणार?
दरम्यान, राज्यात इतर ठिकाणीही मनसेनं मुसंडी मारली आहे. औरंगाबादच्या रेणापूर ग्रामपंचायतीमध्ये ७ पैकी ६, अमरावतीतल्या खैरी सावंगी वाढोवा ग्रामपंचायतीत ७ पैकी ७, यवतमाळच्या शिरपूर ग्रामपंचायतीत ७ पैकी ६ तर बीडच्या नारेवाडी ग्रामपंचायतीमध्ये मनसेनं ७ पैकी ५ जागी विजय मिळवत या ग्रामपंचायती खिशात घातल्या आहेत. अजूनही अनेक ठिकाणी मतमोजणी सुरू असून मनसे किमान १५ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.