मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या अनिल देशमुख यांनी अखेर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. परमबीर यांनी २० मार्चला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. देशमुख यांनी महिन्यापोटी १०० कोटींची वसुली करण्याचे आदेश दिले होते असा दावा परमबीर सिंह यांनी या पत्रात केला होता. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी सीबीआयला चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. ‘मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयमार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केल्यानंतर मंत्री (गृह) या पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही,’ असे देशमुख त्यांच्या राजीनाम्याच्या पत्रात म्हणाले.
स्वतःहून पदापासून दूर
उच्च न्यायालय, मुंबई यांनी त्यांच्याकडे अॅड. जयश्री पाटील यांचेद्वारे दाखल केलेल्या याचिकेमध्ये आज दिनांक ५ एप्रिल २०२१ रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सीबीआयमार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केलेले आहेत. त्यानुषंगाने मी, मंत्री (गृह) या पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही म्हणून मी स्वतःहून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे, असे अनिल देशमुख त्यांच्या पत्रात म्हणाले.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 5, 2021
अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर आता तूर्तास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्रीपद आपल्याकडे ठेवले आहे. परंतु, लवकरच दिलीप वळसे पाटील यांची गृहमंत्रीपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. तसेच उत्पादन शुल्क खाते उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे जाऊ शकेल.
हेही वाचा – परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांची CBI चौकशी होणार