घरताज्या घडामोडीपरमबीर सिंह यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार; अनिल देशमुखांनी केले स्पष्ट 

परमबीर सिंह यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार; अनिल देशमुखांनी केले स्पष्ट 

Subscribe

परमबीर सिंह यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे, असे अनिल देशमुख म्हणाले.

सचिन वाझे प्रकरणी बदली करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यामध्ये राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना महिन्यापोटी १०० कोटींची वसुली करण्याचे आदेश दिले होते असा दावा परमबीर सिंह यांनी या पत्रात केला आहे. मात्र, अनिल देशमुखांनी हे आरोप फेटाळून लावले असून ते परमबीर सिंह यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार आहेत. परमबीर सिंह यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे, असे देशमुख म्हणाले.

तसेच परमबीर सिंग यांनी आपल्यावर लावलेले आरोप खोटे असल्याचे सिद्ध करण्यासाठी अनिल देशमुख यांनी काही महत्वाच्या मुद्यांकडे लक्ष वेधले आहे.

  • सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर परमबीर सिंग एवढे दिवस शांत का बसले होते? त्याचवेळी त्यांनी आपले तोंड का उघडले नाही ?
  • परमबीर सिंह यांना आपल्याला १७ मार्चला पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात येणार आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी १६ मार्चला एसीपी पाटील यांना व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून काही प्रश्न विचारले आणि त्यांना अपेक्षित असलेली उत्तरे मिळवली. हा परमबीर सिंह यांच्या मोठ्या कटाचा भाग होता. या चॅटच्या माध्यमातून परमबीर सिंह यांना पद्धतशीरपणे पुरावे जमा करायचे होते. या चॅटवरून उत्तरे मिळवताना परमबीर सिंह किती अधीर झाले होते हे त्यांच्या चॅटवरून आपल्या लक्षात येईल. परमबीर सिंग हे एसीपी पाटील यांच्याकडून वारंवार वदवून घेत आहेत. याचा अर्थ काय?
  • १८ मार्च रोजी मी लोकमतच्या कार्यक्रमामध्ये परमबीर सिंह यांच्याविरुद्ध काही गंभीर स्वरूपाच्या बाबी पुढे आल्यामुळे त्यांना पदावरून हटवले असल्याचे म्हटल्यानंतर परमबीर सिंह यांनी स्वतःला वाचविण्याच्या दृष्टीने १९ मार्चला पुन्हा व्हॉट्सअ‍ॅपवर संभाषणाचे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला.
  • पोलीस खात्यातील सर्वांना माहित आहे की सचिन वाझे व एसीपी संजय पाटील हे परमबीर सिंह यांच्या अत्यंत जवळचे आहेत. १६ वर्षे निलंबित असलेल्या वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमबीर सिंह यांनी स्वतःच्या अधिकारात घेतला.
  • परमबीर सिंह यांचे आरोप धादांत खोटे आहेत. त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत. मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करत आहे.
  • सचिन वाझे यांनी जर फेब्रुवारीमध्ये परमबीर सिंह यांना भेटून हे सर्व सांगितल्याचे परमबीर सिंह म्हणतात, तर त्याचवेळी त्यांनी का सांगितले नाही. एवढे दिवस शांत का होते?
  • विस्फोटक प्रकरणात आपण अडचणीत येऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंह यांनी असे खोटे आरोप करून सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे.
  • स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू या गंभीर प्रकरणाचा तपास भरकटवण्यासाठी परमबीर सिंह यांनी रचलेले हे षडयंत्र आहे.
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमबीर सिंह यांच्या आरोपाची निष्पक्ष चौकशी करावी.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -