राज्यात सध्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनादरम्यान आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी विधानसभेत राज्यातील पोलीस भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे. राज्यात 5297 पदांची पोलीस भरती अंतिम टप्प्यात आहे. तर 7231 पदांची भरती येत्या काही दिवसात सुरु करण्यात येईल अशी घोषणा गृहमंत्र्यांनी केली आहे. यामुळं पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. गृहमंत्री म्हणाले की, येत्या काही दिवसांत पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण होईल. उमेदवारांना नेमणूक आदेश देण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. काही ठिकाणी मुलाखती घेण्याचे काम सुरु आहे. तर येत्या काही दिवसात 2019 ची पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.
7231 पदांसाठीची पोलीस भरती प्रक्रिया लवकरच
गृहमंत्री म्हणाले की, “अजूनही पोलीस भरती प्रक्रिया बाकी आहे परंतु पुढील काही दिवसांत ही प्रक्रिया संपणार आहे. यानंतर महाराष्ट्र पोलीस दलातील 7231 कॉन्स्टेबल पदांची दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. या पोलीस भरतीसाठी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे. तसेच यामध्ये आता गैरप्रकार होणार नाही याची काळजी घेतली जाईल. तसेच पुढच्या भरतीबाबत मंत्रिमंडळात प्रस्ताव देत त्याला परवानगी मिळाल्यास ही भरती प्रक्रिया देखील लवकरंच सुरु करणार आहोत.”
पोलीस निवासी इमारतींसाठी मोठी तरतूद
“महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाहिले तर पोलीस स्टेशनच्या इमारती जुन्या झाल्या आहेत. वर्षानु वर्षे म्हणजे ब्रिटीशकालीन इमारती आहेत. ८७ पोलीस स्टेशनची बांधकामे हाती घेतली आहेत. ज्याला इमारत नाही त्याला इमारत करण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्याचबरोबर यंदाच्या वर्षात पोलीस स्टेशनच्याबरोबर निवासी इमारतींसाठी मोठी तरतूद केली आहे” असही गृहमंत्री म्हणाले.
पोलिसांसाठी ५० हजारांचे सानुग्रह अनुदान मंजूर
“राज्य राखीव दलातील जे पोलीस अंमलदार आहेत. त्यांना एसआरपीमधून पोलीसात जायला संधी होती. यासाठी पूर्वी 15 वर्षाची अट होती ती आता 12 वर्षाची केली आहे. यामुळे एसआरपीएफमधून लवकरात लवकर जाता येईल. पोलीस विभागात मोठी कामगिरी केली त्यामुळे मला वाटले त्यांच्या कामगिरीचे काही कौतुक होईल परंतु तसे झाले नाही” असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. तसेच पोलिसांसाठी ५० हजारांचे सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.
प्रलंबित प्रकरण मार्गी लावण्यासाठी 138 नवीन न्यायालये होणार स्थापन
“प्रलंबित प्रकरण लवकर निकाली काढण्यासाठी 138 न्यायालये स्थापन करण्यात येणार आहेत. होमगार्ड आपली मोठी ताकद आहे. परंतु बऱ्याच वेळेला होमगार्डमध्ये पूर्ण दिवस काम मिळत नाही. यांना काम देण्यासाठी अर्थविभागाकडे प्रोसेस सुरु आहे. पोलीस भरती कधी करणार विचारण्यात येते.
पोलीस सेवेत नियुक्त झालेला शिपायाला निवृत्त होताना पोलीस उपनिरीक्षकाची संधी मिळायची किंवा नाही. म्हणून कालबद्ध पदोन्नती देण्याचा निर्णय दिला नाही. त्यामुळे आता ३० वर्षानंतर निवृत्त होणारा शिपाई सब इंन्स्पेक्टर म्हणून सेवा दिल्यानंतर निवृत्त होईल” असंही गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले.
लोक प्रतिनिधींना येणाऱ्या धमक्यांच्या चौकशीसाठी स्वतंत्र समिती
“लोक प्रतिनिधींना येणाऱ्या धमक्यांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र समिती तयार केली आहे. या समितीच्या रिपोर्टनंतर पुढील उपाययोजना राबवण्यात येईल. मिलिंद भारांबे यांच्या नेतृत्वात समिती तयार केली आहे. लोक प्रतिनिधींना धमक्या आल्यास आपल्याला काळजी करणं आवश्यक आहे” असंही गृहमंत्र्यांनी नमूद केले.
पेपरफुटी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा दाखल
पेपरफुटीमध्ये राज्यातील पोलिसांनी अतिशय कडक भूमिका घेतली आहे. कारण त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोणालाही खेळता येणार नाही. यामध्ये आतापर्यंत 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील काही लोकांना अटक करण्यात आली आहे. अशी महितीही गृहमंत्र्यांनी आज विधानसभा दिली आहे.
राजकीय आंदोलकांवरील खटले मागे घेणार
यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राजकीय आंदोलकांवररील खटले मागे घेणार असल्याचे जाहीर केले आहे. राजकीय आंदोलनातील 188 चे सर्व खटले पाठिमागे घेण्याचा तत्त्वत: निर्णय घेतला आहे. प्रस्ताव आयुक्तांच्या माध्यमातून, जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात असेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडून आल्यावर केसेस मागे घेणार, अशी माहिती त्यांनी दिली आहे.