नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो (एनसीआरबी) च्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. या अहवालानुसार, २०१९ मध्ये राज्यात १३.६ टक्के लोकांनी आत्महत्या केली किंवा त्यांचा अपघाती मृत्यू झाला असल्याचे या अहवालात स्पष्च करण्यात आले आहे. यावरून असे लक्षात येते की, आत्महत्या आणि अपघाती मृत्यूंचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे.
बिहारमध्ये सर्वात कमी आत्महत्या
मिळालेल्या माहितीनुसार, वर्षभरात राज्यात आत्महत्या किंवा अपघातामुळे १८ हजार ९१६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, महाराष्ट्रापाठोपाठ तामिळनाडूत १३ हजार ४९३ लोकांनी आत्महत्या केली आहे. त्याखालोखाल पश्चिम बंगालमध्ये १२ हजार ६६५ लोकांनी आत्महत्या केल्या आहेत.
कर्नाटकमध्ये ११२८८, उत्तर प्रदेशात ५४६४, राजस्थानात ४५३१, बिहार ६४१, झारखंड १६४६, छत्तीसगड ७६२९, ओडिशा ४५८२, मध्यप्रदेश १२४५७ आणि गुजरातमध्ये ७६५५ लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. दिलासादायक बाब म्हणजे बिहारमध्ये सर्वात कमी आत्महत्या झाल्याचे सांगितले जात आहे.
तामिळनाडूत दरवर्षी आकडा कमी
गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रात आत्महत्या आणि अपघाती मृत्यूंच्या घटनांमध्ये कोणताही बदल झालेला नसल्याचे या अहवालावरून स्पष्ट होत आहे. राज्यात २०१७ मध्ये १३.६ टक्के, २०१८ मध्ये १३.४ टक्के आणि २०१९ मध्ये १३.६ टक्के लोकांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालमधील आत्महत्या प्रकरणाची स्थिती जशास तसे आहे तर तामिळनाडूत दरवर्षी हा आकडा कमी होत आहे. कर्नाटकमध्येही आत्महत्या आणि अपघाती मृत्यूंच्या प्रमाणात घट झाली आहे.