कर्नाटक- महाराष्ट्र सीमा प्रश्नावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरून ठाकरे गटासह, काँग्रेस, राष्ट्रवादी शिंदे – फडणवीस सरकारवर टीका करत आहे. या प्रकरणावरून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मागील अडीच वर्षात काय केलं? अरे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा आंदोलनात एकनाथ शिंदे 40 दिवस जेल भोगून आला आहे. तुम्हाला आम्हाला शिकवण्याचा अधिकार नाही. अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे यांनी कालच्या पत्रकार परिषदेत राज्यातील अनेक घडामोडींवरून सरकारवर टीकेचे बाण सोडले. राज्याचे मुख्यमंत्री विशेषत: भाजपच्या अखत्यारितले हे त्यांच्या वरिष्ठांच्या परवानगीशिवाय काही बोलू चालू शकतात का? असा सवाल करत , पंतप्रधानांनी सांगितलंय 40 गावं त्यांना द्या, POK तील 100 गावं तुम्हाला देऊ, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदेंना ठाकरेंनी टोला लगावला.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
उद्धव ठाकरेंच्या या आरोपांवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना पलटवार केला आहे.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कर्नाकट सीमाप्रश्नावर मी बोललो आहे, हा 2012 चा विषय आहे. त्यावेळी कोणाचं सरकार होतं. मागीच अडीच वर्षात काय केलं? महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा आंदोलनात अरे एकनाथ शिंदे 40 दिवस जेल भोगून आला आहे. तुम्हाला आम्हाला शिकवण्याचा अधिकार नाही.
काल परवा आम्ही निर्णय घेतला, तुम्ही मागील अडीच वर्षे सत्तेत होता काय केलं? तुम्ही योजना बंद केल्या, परवाच्या बैठकीत या बंद झालेल्या योजना आम्ही सुरु केल्या. ज्या योजना नव्हत्या त्या नव्याने सुरु केल्या. सीमावर्ती भागात मराठी माणसाला न्याय देण्याचं काम आम्ही करतोय. त्यामुळे मराठी माणसाबद्दल आम्हाला शिकवण्याची गरज नाही, महाराष्ट्रातील एक इंचही जागा कुठेही जाऊ देणार नाही. जत तालुक्यातील 40 गावांच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी आमच्या सरकारची आहे. असं एकनाथ शिंदे म्हणाले.
उद्धव ठाकरेंचा आरोप
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीच्या जत तालुक्यातील 40 गावं कर्नाटकात सामील होतील असं म्हटलं होतं. यावर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.
सध्या राज्यातील ईडी सरकारला मुख्यमंत्री आहे की नाही काही कळत नाही, कारण मुख्यमंत्री कधी बोलतचं नाही. त्यांना विचारलं तर ते सांगतील की काळजी करु नका मी पंतप्रधानांना सांगितलं आहे. पंतप्रधान म्हणाले की, त्यांनी ४० गावं घेतली तर घेऊ द्या आपण पाकव्याप्त काश्मीर जिंकल्यानंतर त्यातील १०० गावं महाराष्ट्राला देऊ, असंही ते सांगू शकतील, असा टोलाही मुख्यमंत्री शिंदेंनी लगावला आहे.