जम्मू-काश्मीरच्या राजौरी येथे दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राचे सुपुत्र जोतिबा गणपत चौगले यांना वीरमरण आले आहे. ते ३६ वर्षांचे होते. आज सकाळी तीन वाजता राजौरी येथे दहशतवाद्यांसोबत चकमक सुरु होती. या चकमकीत त्यांना वीरमरण आले. जोतिबा चौगले हे मुळचे कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील महागाव गावचे रहिवासी होते. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.
जोतिबा चौगुले २००९ साली दाखल झाले होते. जम्मूच्या राजौरी येथे ते कार्यरत होते. मात्र आज सकाळी आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी १७ डिसेंबर रोजी दुपारी महागाव येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.