आजपासून राज्याचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. यावर्षी नागपूर ऐवजी मुंबईत हे हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. २८ डिसेंबरपर्यंत हे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन असणार आहे. तसेच या अधिवेशनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उपस्थितीत राहणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार या हिवाळी अधिवेशनात २६ विधेयके मांडली जाणार आहेत. दरम्यान या हिवाळी अधिवेशनात विविध मुद्द्यावरून ठाकरे सरकारला घेरण्यासाठी भाजप तयारीत आहे. यंदाचे अधिवेशन वादळी होणार असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी काल, मंगळवारी झालेल्या अधिवेशनाच्या निमित्ताने सह्याद्री अतिथिगृहात आयोजित चहापानाच्या कार्यक्रम पार पडला. या चहापानाच्या कार्यक्रमला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित होते. तसेच या चहापानाच्या कार्यक्रमावर भाजपने बहिष्कार टाकला होता.
कोणत्या मुद्द्यावर विरोधक होणार आक्रमक
भाजपच्या बारा आमदारांचे निलंबन, विधानसभा अध्यक्षांची आवाजी पद्धतीने निवड, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, महिला सुरक्षा, महावितरणकडून करण्यात येणारी सक्तीची वसुली, नोकर भरतीचा गोंधळ, पेपरफुटी, परीक्षेतला विलंब आणि शेतकरी प्रश्न अशा विविध मुद्द्यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
तसेच आज विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीची प्रक्रिया आज पार पडली जाईल. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी नाना पटोले यांना देण्यात आली होती. मात्र त्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाचा नाना पटोले यांनी राजीनामा दिला आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारले. मागील अधिवेशनाचे कामकाज उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी पाहिले होते. पण आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीच्या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. मात्र विधानसभा अध्यपदावर कोण उमेदवार असेल हे काँग्रेसने अद्याप स्पष्ट केले नाही. परंतु विधानसभा अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेवरून भाजप आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिवेशनातील भाजपच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा – Maharashtra Winter Assembly Session 2021 Live Update: धनंजय मुंडे, छगन भुजबळ विधानभवनात पोहोचले