राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कालच्या (बुधवार) मंत्रीमंडळ बैठकीत सर्व मंत्र्यांनी सुतोवाच केला होता की, राज्यातील शहरांमध्ये जरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी ग्रामीण भागात कोरोनाची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन वाढवण्यात निर्णय झाला असून ३१ मेपर्यंत लॉकडाऊन असणार, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आहे. आता राज्यात १ जून सकाळी ७ वाजेपर्यंत ‘ब्रेक द चेन’ अंतर्गतचे कोविड-१९ संदर्भातील कडक निर्बंध लागू राहणार आहेत. राज्यसरकारकडून ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी RTPCR अहवाल असणे बंधनकारक केले आहे.
राज्य सरकारने ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत राज्यात कडक निर्बंध १ जूनपर्यंत लागू केले आहेत. १ जून सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यादरम्यान घोषित केलेल्या संवेदनशील परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांना आरटीपीसीआरचा ४८ तासांचा निगेटिव्ह अहवाल असणे गरजेचे आहे. कारण महाराष्ट्रातील रुग्णसंख्या कमी होत असली तरी आजूबाजूच्या राज्यातील रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे इतर राज्यातून संसर्ग येऊ नये म्हणून राज्य सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. दरम्यान स्थानिक मंडई संदर्भात जिल्हाधिकारी निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच दुकानं उघडी ठेवण्यासंदर्भात पूर्वीचे नियम या लॉकडाऊनमध्ये लागू असणार आहेत.
नवे निर्बंध
- परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी ४८ तास आधीचा निगेटिव्ह अहवाल आवश्यक
- तसेच राज्यात घोषित केलेल्या संवेदनशील राज्यातून येणाऱ्यांना आरटीपीसीआरचा अहवाल बंधनकारक
- एअरपोर्ट, बंदरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मेट्रो, मोनो, लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली
- माल वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये चालकासह फक्त क्लीनरलाच प्रवासाची मुभा
- एपीएमसी बाजारपेठांसंदर्भात निर्बंध लागू करण्याचा स्थानिक प्रशासनाला अधिकार
- दूध वाहतुकीसाठी कोणत्याही प्रकारचे निर्बंध असणार नाहीत
- परराज्यातून मालवाहूतक करणाऱ्यांचा आरटीपीसीआर निगेटीव्ह अहवाल ७ दिवस ग्राह्य धरला जाईल