वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवल्यानंतर राज्य सरकारने तिसऱ्या लाटेसाठी सज्जता सुरू केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी अतिशय काटेकोर नियोजन करण्याची सूचना केली. सर्व जिल्ह्यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडील ऑक्सिजन प्रकल्प तात्काळ उभारले जातील, आवश्यक औषधांचा साठा राहील याची काळजी घ्यावी असे सांगून उद्धव ठाकरे यांनी निर्बंधाच्या काळात दुर्बल घटकांसाठीच्या जाहीर पॅकेजप्रमाणे या घटकांना तात्काळ लाभ द्यावा. केवळ घोषणा नव्हे तर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली दिसली पाहिजे अशा स्पष्ट सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या.
ठाकरे यांनी आज कोरोना परिस्थितीसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी प्रशासनाला तिसऱ्या लाटेची कल्पना देत त्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले.
राज्यातील कडक निर्बंधांमुळे कोरोनाची रुग्णसंख्या काही प्रमाणात स्थिरावली असली तरी आपल्याला आता अतिशय सावध राहून पुढील तिसऱ्या लाटेचे नियोजन करावे लागेल. कडक निर्बंध लावल्यानंतर लगेचच रुग्णसंख्येत उतार पडेल असे नाही. तरी देखील वेळेत कडक निर्बंध लावल्याने अंदाजित मोठी रुग्ण वाढ आपण रोखू शकलो, असे ठाकरे म्हणाले. तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग महत्वाचा आहे. पण त्यासाठी पुरेश्या प्रमाणात आणि वेळेवर लस पुरवठा अतिशय गरजेचा आहे.
हेही वाचा – Corona Third Wave: राज्यात जुलै-ऑगस्ट महिन्यात कोरोनाची तिसरी लाट, तयारीवर टोपे म्हणाले…