राज्यातील लॉकडाऊन शिथील करण्याबाबत आज मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. यानंतर आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये ठाकरे सरकारने घेतलेल्या दोन महत्त्वाच्या निर्णयाबाबत सांगितले. एक म्हणजे इयत्ता १० वीप्रमाणे आता १२वीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तसेच दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्यात ५ टप्प्यात अनलॉक आणि लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे राज्यातील काही ठिकाणी लॉकडाऊन हटवण्यात आणि शिथिल करण्यात येणार आहेत. तशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के आणि ऑक्सिजन बेड्सची क्षमता २५ टक्क्यांपेक्षा कमी आहे, त्या ठिकाणी लॉकडाऊन हटवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पूर्ण क्षमतेने व्यवहार सुरू राहणार आहे. चित्रपटगृह, कार्यालये, शूटिंग, जीम, सलून पहिल्या टप्प्यात सुरू राहणार आहेत. तसेच आंतरजिल्हा प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. प्रत्येक आठवड्यात पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेड्सच्या क्षमतेनुसार जिल्हे पाच टप्प्यात विभागले जाणार आहेत.
जाणून घ्या पाच टप्पे
पहिला टप्पा – ५ टक्के पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची क्षमता २५ टक्क्यांपेक्षा कमी असायला पाहिजे. या पहिल्या टप्प्यात एकूण १८ जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये औरंगाबाद, भंडारा,बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ हे जिल्हे आहे. येथे लॉकडाऊन हटवण्यात येणार आहे.
दुसरा टप्पा – ५ टक्के पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची क्षमता २५ ते ४० टक्के असायला पाहिजे. या टप्प्यात ५ जिल्ह्यांचा समावेश आहे. अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर आणि नंदूरबार. या टप्प्यामध्ये काही निर्बंध अंशतः शिथिल करण्यात येतील.
तिसरा टप्पा – ५ ते १० टक्के पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची क्षमता ४० टक्क्यांपेक्षा जास्त असायला पाहिजे. या तिसऱ्या टप्प्यात १० जिल्ह्यांचा समावेश आहे. अकोला, बीड, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधूदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद.
चौथा टप्पा – १० ते २० दरम्यान पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची क्षमता ६० टक्क्यांपेक्षा जास्त पाहिजे. यामध्ये २ जिल्ह्यांचा समावेश आहे. पुणे, रायगड.
पाचवा टप्पा – २० टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची क्षमता ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाहिजे. १० जिल्हे पाचव्या टप्प्या असणार आहे. (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)