घरमहाराष्ट्रराज्यातील लॉकडाऊन ३० मेपर्यंत वाढणार?

राज्यातील लॉकडाऊन ३० मेपर्यंत वाढणार?

Subscribe

चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असून आता शहरांकडून तो ग्रामीण भागापर्यंत पोहोचला आहे. या वाढत्या संकटाला रोखण्यासाठी १५ मेपर्यंतचा लॉकडाऊन उपयोगी ठरणार नाही. आणखी १५ दिवस म्हणजे ३० मेपर्यंत कडक निर्बंध घालून कोरोनाला रोखण्याचा ठाकरे सरकार विचार करत आहे. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्यात अनेक जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव आणि रुग्णसंख्येतील वाढ अद्याप कायम आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे राज्यात १५ मेपर्यंत लागू असलेल्या लॉकडाऊनमधील नियमावलीत कुठलीही सूट मिळणार नाही. उलट ३० मेपर्यंत कडक लॉकडाऊन केल्यास त्याचा कोरोनाची साखळी तोडण्यास मदतच होईल, असे मत बहुतांशी लोकप्रतिनिधींचे झाले असून राज्याचे मंत्रीगण तसाच विचार करत आहे. लोकप्रतिनिधी आणि मंत्री यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सहमत विचार करत असल्याचे समजते. यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन अंतिम निर्णय होईल, असे समजते.

- Advertisement -

नाशिकसह सात जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला असला तरी त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या आणि कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. अशावेळी आता जिल्हा पातळीवर लॉकडाऊन वाढवण्याचे निर्णय घेतले जात आहेत. आज नाशिक, अमरावती, यवतमाळ, कोल्हापूर, वाशिम, सातारा, सोलापूर आणि वर्धा या जिल्ह्यात कडक लॉकडाऊन वाढवण्यात आलाय. जिल्हाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या विचाराने हा निर्णय घेण्यात येत आहे.

नाशिक शहरात 12 मे म्हणजे बुधवारपासून पूर्ण टाळेबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 12 तारखेला दुपारी 12 ते 22 तारखेच्या दुपारी 12 असे 10 दिवस संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या काळात रुग्णालये आणि औषधी दुकाने सोडून सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. कुणालाही रस्त्यावर फिरता येणार नाही, अशी माहिती नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी दिलीय. अमरावती जिल्ह्यात रविवारपासून 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी केलीय. या काळात फक्त रुग्णालये आणि औषधी दुकाने सुरू राहणार आहेत. त्यामुळे आता कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही. राज्य सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात दारुच्या दुकानांसमोर मोठी गर्दी होत असल्यामुळे आता दारुची दुकानेही बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी घेतला आहे.

- Advertisement -

यवतमाळ जिल्ह्यातही रविवारपासून 15 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात सकाळी 7 ते 11 या वेळेत अत्यावश्यक बाबी सुरू राहणार आहेत. ठरवून दिलेल्या वेळेनंतर दुकाने सुरू ठेवल्यास कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलीय. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतोय. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी काही गंभीर बाबी दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे 2 दिवसांत लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल. कोल्हापुरात कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची मागणी वाढतेय. तसेच तरुण मुलांचे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे 10 ते 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन करावा लागेल, असे संकेत मुश्रीफ यांनी दिले आहेत.

वर्धा जिल्ह्यात 8 मे ते 13 मे दरम्यान कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. लॉकडाऊन असतानाही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिकांची रस्त्यावर गर्दी पाहायला मिळत होती. त्याचा परिणाम जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा आकडा झपाट्याने वाढत होता. अशावेळी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी 5 दिवस कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला. या काळात फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकानांना पार्सल सुविधेचीच परवानगी देण्यात आलीय. तसेच कोणत्याही व्यक्तीला अत्यावश्यक वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. वाशिम जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी रविवारपासून ते 15 मे पर्यंत 6 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आज या लॉकडाऊनचा दुसरा दिवस आहे. वाशिम शहरातील मुख्य रस्त्यावर आणि चौकात शुकशुकाट दिसून आला. तसेच व्यापार्‍यांनी आपली दुकाने पूर्णतः बंद ठेवली आहेत. या लॉकडाऊन दरम्यान कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक आणि वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास पूर्णतः बंदी राहणार आहे. तसेच दवाखाने, मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने, आस्थापना पूर्णतः बंद राहणार आहे. यात अत्यावश्यक सेवेतील किराणा, भाजीपाला, फळ आणि दूध घरपोच सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंत मुभा देण्यात आली आहे.

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत सातारा जिल्हा सातव्या क्रमांकावर तर मृत्यूदराच्या बाबतीत चौथ्या स्थानावर आहे. सातारा जिल्ह्यात सध्या 20 हजार 448 कोरोना रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 2 हजार 828 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. रुग्णांसाठी बेड उपलब्ध करण्याचे मोठे आव्हान सध्या आरोग्य यंत्रणेसमोर उभे आहे. अशा स्थितीत सातारा जिल्ह्यात रविवारपासून लॉकडाऊन अजून 5 दिवस वाढवण्यात आला आहे. जिल्ह्यातील लॉकडाऊन आता 15 मे पर्यंत करण्यात आलाय. तशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिलीय. सोलापूर शहर जिल्ह्यात रविवारी रात्री आठ वाजल्यापासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. हा लॉकडाऊन 15 मे पर्यंत असणार आहे. या काळात भाजीपाला, किराणा दुकाने, चिकन, मटण, अंड्याची दुकाने पूर्णत: बंद राहतील. त्याचबरोबर मार्केट हाऊस, रिसॉर्ट, लॉजही बंद राहणार आहेत. किराणा दुकाने आणि भाजीपाला विक्रेत्यांना सकाळी 7 ते 11 या वेळेत घरपोच सेवा देण्याची मुभा देण्यात आलीय. तसेच सकाळी 6 ते 9 या वेळेत दूध विक्रेत्यांना घरपोच दूध देता येणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -