मुंबई : विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेतून (Shiv Sena) फुटलेले 16 आमदार पात्र की अपात्र, याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर घ्यावा, असे आदेश 11 मे 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिले. या 16 आमदारांमध्ये पहिले नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गट तसेच ठाकरे गटाकडून पक्षाची घटना मागणविण्याऐवजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) हे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) मागविणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र, तेव्हा एकच शिवसेना अस्तित्वात होती आणि दुसरा होता तो फुटीर गट, असे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड (Dr. Jitendra Awhad) यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
राहुल नार्वेकर हे अपात्रतेचा निर्णय घेण्यासाठी म्हणून शिवसेनेच्या दोन्ही गटांची घटना मागविणार आहेत असे बातम्यांमध्ये सांगितले जाते. पण, जेव्हा पक्षविरोधी कारवाया केल्या गेल्या आणि अपात्रतेचा निर्णय घेण्याची वेळ आली; तेव्हा मात्र एकच शिवसेना अस्तित्वात होती आणि दुसरा होता तो फुटीर…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 27, 2023
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शाह, न्या. कृष्णा मुरारी, न्या. हिमा कोहली व न्या. पी. आर. नरसिम्हा यांच्या घटनापीठाने 11 मे 2023 रोजी हा निकाल दिला. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सुमारे 35 मिनिटे निकालाचे वाचन केले. यामध्ये 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग केला. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून पक्षाची घटना मागवण्याऐवजी थेट निवडणूक आयुक्तांकडून त्या मागवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. त्यानुसार खरी शिवसेना कोणती तसेच घटनेप्रमाणे चालणारा पक्ष कोणता, याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर अपात्रतेबाबत निर्णय घेतला जाईल, असेही सांगितले जाते.
त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केले आहे. राहुल नार्वेकर हे अपात्रतेचा निर्णय घेण्यासाठी म्हणून शिवसेनेच्या दोन्ही गटांची घटना मागविणार आहेत, असे सांगितले जाते. पण, जेव्हा पक्षविरोधी कारवाया केल्या गेल्या आणि अपात्रतेचा निर्णय घेण्याची वेळ आली; तेव्हा मात्र एकच शिवसेना अस्तित्वात होती आणि दुसरा होता तो फुटीर गट. त्यामुळे राहुल नार्वेकर जे काही करीत आहेत ते, वेळ काढण्याचा प्रयत्न आहे. जो त्यांनाही शक्य नाही. संविधान तेव्हा फक्त एकाकडेच होते, ते म्हणजे शिवसेना, धनुष्यबाण आणि उद्धव ठाकरे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.