महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदार अपात्रतेबाबत वेळकाढूपणा करत आहेत, असा आरोप करत ठाकरे गटाने याचिका दाखल केली आहे. यावर बोलताना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर टीका केली आहे. (Maharashtra Politics Can the Speaker of the Legislative Assembly run an extra constitutional government The Sanjay Rauts attacked the Rahul Narvekar)
संजय राऊत म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात काय होईल, यावर मी आज भाष्य करणार नाही. पण सत्य आणि न्याय याचा विजय होईल. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश स्पष्ट आहेत. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधिमंडळातील फूट म्हणजे पक्षातील फूट नाही, हे कोर्टानं स्पष्ट सांगितलं असल्यावर, याविषयी कुठल्या प्रकारचा संभ्रम असण्याचं कारण नाही, असं म्हणत विधानसभा अध्यक्ष हे विधिमंडळाशी बेईमानी करत असल्याचा घणाघात त्यांनी केला.
आमदार अपात्रतेसंदर्भात जो वेळ काढूपणा सुरू आहे. ही विधिमंडळाची बेईमानी आहे. घटनाबाह्य सरकारला घटनात्मक पदावर बसलेले अध्यक्ष चालवत आहेत का? किंवा चालू देत आहेत का? असा प्रश्न आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, असं म्हणत राऊतांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर टीकास्त्र डागलं आहे.
रामदेव बाबांनी समजून घ्यायला हवं
संजय राऊत यांनी सनातन धर्म आणि रामदेव बाबांवरही भाष्य केलं. आमची भूमिका आम्ही सामना मध्ये स्पष्ट केली आहे. मोक्षाचा मार्ग कुठून आहे? तो तामिळनाडूमधील भूमी मधूनच आहे, हे आम्ही उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. चाळीस हजार मंदिरं जी तामिळनाडूच्या भूमीत आहेत, त्या तामिळनाडूतून कोणी हिंदू धर्मावर काहीही बोलतं, त्याच्यावर धर्माची ध्वजा फडकते आहे. बाबा रामदेव यांना हे समजलं पाहिजे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
(हेही वाचा: संसदेत मोदींचे 50 मिनिटांचे अखेरचे भाषण: नेहरु, इंदिरा गांधीची स्तुती, संसदेवरील हल्ल्याला म्हटले आत्म्यावरील हल्ला )