बीड : राज्यातील राजकारणात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटताना दिसत असतानाच आता भाजपच्या नेत्या माजी आमदार पंकजा मुंडे यांनी जालना जिल्ह्यातील अंबडमधील ओबीसी एल्गार मेळाव्याच्या अनुपस्थितीवरून मोठं विधान केलं आहे. आपण या मेळाव्याला उपस्थित का राहू शकलो नाही याबाबत त्यांनी खुलासा केला असून, पक्षाने परवानगी नाकारल्याचे मोठं विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे आता भाजपमधील अंतर्गंत कलह चव्हाट्यावर येऊ पाहत आहे. (Maharashtra Politics Party denied permission to go to OBC rally Big statement by Pankaja Munde)
2014 च्या विधानसभा निवडणुकीपासून या ना त्या विधानाने चर्चेत असलेल्या पंकजा मुंडे यांनी आज शुक्रवारी (17 नोव्हेंबर) रोजी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात पार पडलेल्या ओबीसींच्या एल्गार मेळाव्याला हजर न राहण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्या म्हणाल्या की, ओबीसी आरक्षण बचाव सभेसाठी जायला माझ्या पक्षाने मला परवानगी दिली नाही, असे थेट वक्तव्य केल्यांने आता ही परवानगी पक्षातील कोणत्या नेत्याने नाकारली याचाही शोध घेणे गरजेचे असून, असे जरी असले तरी मात्र आता राज्यातील जातीपातीच्या राजकारणामुळे भाजप सारख्या सत्तेतील पक्षातील अंतर्गंत कलह बाहेर येत असल्याचे चित्र आहे. तर पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, सभेमध्ये छगन भुजबळ यांचं प्रमुख भाषण होणार होतं आणि त्यावर त्यांनी आपली ओबीसी आरक्षणावरची भूमिका मांडली असल्याचा देखील पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
माझं राजकारण वंचितांसाठी
यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, ओबीसीची जनगणना व्हावी अशी भूमिका गोपीनाथ मुंडे यांनी मांडली होती आणि या भूमिकेचे सर्वांनी स्वागत केलं होतं. तर आपणही स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांच्या मार्गावर जात असून, माझं राजकारण हे गरिबांसाठी आणि वंचितांसाठी आहे. मी दोन जातींमध्ये कधीच भिंत निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही आणि करणार पण नाही. मला ओबीसीच्या कुठल्याही कार्यक्रमासाठी आमंत्रणाची गरज नसून मी बहुजनांच्या बाजूने आहे अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हेही वाचा : Maharashtra Politics : भुजबळांच्या पवित्र्यामुळे अजित पवार गटाची कोंडी?
ते ओबीसी नेते म्हणून बोलले…
अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना भुजबळांच्या आक्रमक विधानांबाबत विचारले असता, छगन भुजबळ मागील अनेक वर्ष ओबीसी चळवळीत काम करत आहेत. त्या माध्यमातून ते बोलले असावेत. भुजबळ आज ओबीसी नेते म्हणून मेळाव्यात बोलले. पक्षाची ती भूमिका नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही पक्षाची भूमिका आहे. मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता ते आरक्षण द्यावे, असे त्यांनी सांगितले. तेव्हा छगन भुजबळ ज्या गटाचे नेते आहेत त्यांनीसुद्धा ही पक्षाची भूमिका नाही म्हणत हात झटकले आहेत.