इगतपुरी: राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षण द्यावं, अशी मागणी केली जात आहे. याला ओबीसी नेत्यांनी तीव्र विरोध केला आहे. अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री आणि ओबीसी नेता छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यावर विरोध दर्शवला आहे. तसंच, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहनही केलं आहे. नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरीमध्ये छगन भुजबळ यांची सभा सुरू आहे. यावेळी आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, असं छगन भुजबळ म्हणाले. (Maharashtra Politics Remove village ban boards immediately Chhagan Bhujbal s reiteration appeal to Devendra Fadnavis )
छगन भुजबळ म्हणाले की, मला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगायचंय की मागच्या दोन महिन्यांपासून आम्हाला धमकीचे मेसेज, कॉल येत आहेत. फोन उचलल्यावर समोरून शिव्यांची लाखोली वाहिली जाते. जीवे मारण्याची धमकी दिली जाते. यासंदर्भात तक्रार केली तर त्यावर काहीही कारवाई केली जात नाही. हे काय सुरूय राज्यात, असं म्हणत राऊतांनी सरकारला घरचा आहेर दिला.
तसंच, भुजबळ म्हणाले की, आता गावबंदी केलेली आहे. कोणालाच गावात येऊ दिलं जात नाही. असं करुन काय मिळणार, त्या व्यक्तीला येऊ द्या ना गावात. ती व्यक्ती काय बोलते ते ऐकून घ्या. पटलं तर समर्थन करा. नाही पटलं तर पुढच्या वेळी निवडून आणू नका. पण गावातच येऊ देणार नाही, ही कोणती लोकशाही आहे. गावातली काही दोन-चार टकली गावात प्रवेश नसल्याचे बोर्ड लावतात. अरे हा महाराष्ट्र काय तुमच्या सातबाऱ्यावर लिहिलाय का? असा सवाल करत भुजबळांनी मराठा आंदोलकांवर टीका केली. तसंच यावेळी त्यांनी पोलीस आणि फडणवीसांना आवाहन केलं की, गावबंदीचे लावलेले बोर्ड ताबडतोब काढून टाका. कारण, देशाच्या संविधानात 19 वं कलम आहे, त्यानुसार कोणीही कुठेही फिरू शकतो, जाऊ शकतो.
… मग तुम्ही जागे होणार का?
भुजबळ म्हणाले की, गावबंदीचे जे बोर्ड लावले जात आहेत त्यावर पोलीस कधी अॅक्शन घेणार आहेत? नाहीतर आमच्यासारखे लोक उठतील आणि जायला सुरूवात करतील आणि मग काठीला काठी भिडेल, डोकी फुटतील. त्यानंतर तुम्ही जागे होणार का? असा संतप्त सवाल करत भुजबळांनी हे बोर्ड काढून टाकण्यास सांगितलं आहे.
(हेही वाचा: ‘लढताना गुन्हे दाखल झाले तर माझ्या आजोबांना अभिमान वाटेल’; आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा )