मुंबई- गेल्या दोन आवड्यांपासून गायब झालेल्या पावसाने पुन्हा राज्यभरात दमदार हजेरी लावली आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पावसाचे आगमन झाले आहे, त्यामुळे गणपती बाप्पासह आता पावसाचेही आगमन होत आहे. आज पहाटेपासून मुंबईसह राज्यात हलक्या आणि मध्यम पावसाच्या सरी बरसत असल्याचे पाहायला मिळाले. तर अनेक ठिकाणी सकाळपासूनचं मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुंबईतील दादर, माहिम, माटुंगा, वांद्रेसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत होता. तर ठाण्यासह पालघर, रायगडमध्ये आज सकाळपासून पावसाने दमदार सुरुवात केली. अचानक सुरु झालेल्या पावसाने प्रवाशांनाचीही काही प्रमाणात तारांबळ उडाली. अशात पावसानंतर आता सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. यात राज्यात काही ठिकाणी पावसाने उडपी दिल्याने पुन्हा उन्हाचा सामना करावा लागत आहे.
हवामान विभागाचे तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्या अंदाजानुसार, मुंबईसह काही भागात रिमझिम पावासाचा अनुभव येईल. अंशत: ढगाळ वातावरण राहिल. तर काही ठिकाणी पावसाची संततधार सुरु राहिल. याशिवाय 30-31 ऑगस्ट दरम्यान राज्यात विदर्भात, संलग्न मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे, तसेच 1 आणि 2 सप्टेंबरला घाट भागासह अनेक ठिकाणी अशीच स्थिती राहण्याची शक्यता, हवामान विभागाने वर्तवली आहे.
30-31 ऑगस्ट दरम्यान राज्यात विदर्भात, सलग्न मराठवाडा, द.मध्य महाराष्ट्र हलका ते मध्यम पावसांची शक्यता. IMD GFS मोडेल नुसार.
1,2 ला पण अशीच स्थिती राहण्याची शक्यता. घाट भागात पण. pic.twitter.com/sQQoMiaSmQ— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 29, 2022
काही राज्यं वगळता उर्वरित राज्यांमध्ये मुसळधार पावसापासून दिलासा मिळत आहे. यात अरुणाचल प्रदेश, नागालँड, पूर्व आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, पूर्व उत्तर प्रदेश, झारखंड, उत्तर छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि केरळमध्ये एका दिवसात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.