राज्याच्या अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. विजांचा कडकडाटासह मुसळधार पाऊस जोरदार बॅटींग करत आहे. विशेष म्हणजे हा परतीचा पाऊस असून या पावसाने राज्याला चांगलंच झोडपून काढले आहे. मात्र मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाचे पाणी शेतात साचल्यने सर्व पिकांची नासाडी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे सोयाबीन आणि कापसाच्या पिकाचे झाले आहे. (Maharashtra Rain Update Return Heavy Rain Pune)
कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासहित मराठवाड्यातील जिल्ह्यात पावसाने जोरदार बॅटिंग केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. याशिवाय, शुक्रवारी राज्यात परतीच्या पावसाने पुणे, मुंबई, ठाणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली.
ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीचा पाऊस कोसळत असल्याने शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी कडू जाण्याची शक्यता आहे. सोयाबीन पिक पूर्णत: पाण्याखाली गेले तर कापसाचेही नुकसान झालं. दरम्यान, राज्यात शनिवारपासून पावसाचा जोर कमी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, 20 ऑक्टोबरपर्यंत राज्यातून पाऊस माघार घेणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
या परतीच्या पावसाचा पुण्याचा चांगलाच फटका बसल्याचे पाहायला मिळते आहे. शुक्रवारी दीड ते दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यात ठिकठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. पुण्याच्या शिवाजी नगर, संगमवाडी, येरवडा, जंगली महाराज, रस्ता, टिळक रस्ता, आपटे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने शहरात वाहतूक कोंडी झाली आहे.
पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार आहे. तर दिवेघाटात ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. रस्त्यांवर अक्षरशः पाण्याचे लोट वाहताना दिसत होते. राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसाची हजेरी लावलसी आहे. यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. शिवाय, राज्यातील सिंधुदुर्ग, पुणे, परभणी, लातूर, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यात देखील पावसाने जोरदार बॅटींग केली आहे.
भिवंडीत वीज कोसळल्याने दोन तरुणींचा जागीच मृत्यू
परतीच्या पावसाने भिवंडी तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. त्यातच शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अचानक विजांचा कडकडाट सुरु होऊन पावसालाही सुरुवात झाली. यावेळी शीतल आणि तिची आई सुगंधा या दोघी मायलेकी योगिता वाघेसोबत शेतात खेकडे पकडण्यासाठी गेल्या होत्या. याचवेळी त्यांच्यावर वीज कोसळली. ज्यात शितल आणि योगिता या दोन तरुणींचा मृत्यू झाला तर सुगंधा वाघे या गंभीर जखमी झाल्या.
हेही वाचा – अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान, ‘खोके’ सरकारला शेतकऱ्यांची दैना दिसेल काय?; ‘सामना’तून शिंदे गटाला सवाल