राज्यात मॉन्सूनला पहिल्या पंधरवड्यातच चांगली सुरूवात झाली आहे. मॉन्सूनने राज्यातील बहुतांश भाग व्यापल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जूनच्या पंधरवड्यात चांगली हजेरी लागल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते आहे. राज्यातील तीन जिल्हे वगळले तर उर्वरीत महाराष्ट्रात मात्र मॉन्सूनने दमदार अशी कामगिरी केली आहे. त्यामुळेच राज्यात पावसाची चांगली सुरूवात झाली आहे असे हवामान विभागाचे म्हणणे आहे.
राज्यात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, ठाणे, मुंबई यासारख्या जिल्ह्यांमध्ये यंदा पंधरवड्यातच समाधानकारक असा पाऊस झाला आहे. पण तुलनेत सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग यासारख्या भागात तितकासा समाधानकारक असा पाऊस झालेला नाही. मराठवाडा आणि विदर्भात तुलनेत चांगला पाऊस झाला आहे.
राज्यातला गेल्या 15 दिवसातील पाऊस…
चांगली सुरुवात…. pic.twitter.com/OaRMjQMbIq— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 16, 2021
मराठवाडा आणि विदर्भ
परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम लातुर, जालना, बीड, औरंगाबाद या जिल्ह्यात तुलनेत चांगला पाऊस झाला आहे. काही जिल्ह्यांचा यासाठी अपवाद आहे. तर विदर्भातही अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदिया यासारख्या जिल्ह्यात पावसाची चांगली हजेरी लागली आहे.
कोणत्या जिल्ह्यात कमी पाऊस
राज्यात धुळे, नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद, बुलढाणा, अहमदनगर यासारख्या जिल्ह्यात तुलनेत कमी पाऊस झाला आहे. काही ठिकाणी अपेक्षेपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. तर राज्यात नंदुरबार, जळगाव, अकोला यासारख्या जिल्ह्यात मात्र पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. सामान्य पावसाच्या अपेक्षेपेक्षाही याठिकाणी कमी पावसाची नोंद झाली आहे.