कोरोनाची दुसरी लाट हळूहळू नियंत्रणात येत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहरी भागातील शाळा सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळून येत्या ४ ऑक्टोबरपासून शाळांची घंटा तब्बल दीड वर्षांनंतर वाजणार आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात वर्गात उपस्थित राहावे लागणार असल्याने दीड वर्षांपासून विविध अॅपच्या माध्यमातून सुरू असलेली ऑनलाईन शाळा पूर्णत: बंद होणार आहे. जे विद्यार्थी आजारी आहेत, काही कारणास्तव शाळेत येऊ शकणार नाहीत किंवा ज्या विद्यार्थ्यांना त्यांचे पालक त्यांना शाळेत पाठवण्यास परवानगी देणार नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी शाळेतील शिक्षण ऑनलाईन उपलब्ध होणार नाही. मात्र, या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्यांना युट्युब, टिलीमिलीच्या माध्यमातून अभ्यासाच्या लिंक पाठवण्यात येणार असून, पालकांनाच त्यांचा अभ्यास करून घ्यावा लागणार आहे.
शहरी भागात इयत्ता आठवी ते बारावी तर ग्रामीण भागात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार आहेत. ग्रामीणमध्ये ज्या जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव कमी आहे अशा ठिकाणी आठवी ते बारावीचे वर्ग आधीपासूनच सुरू आहेत. शाळा उघडणार असल्या तरीही मुलांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांची संमती आवश्यक असेल. विद्यार्थ्यांना उपस्थिती बंधनकारक असणार नाही. शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचार्यांना लसीचे दोन्ही डोस घ्यावे लागणार आहे. शारीरिक अंतर नियम पाळण्यासह कोरोना सुरक्षेच्या सर्व उपाययोजना शाळांमध्ये करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन सांगितले.
जुलैमध्ये कोरोनामुक्त ग्रामीण भागात आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या. त्यानंतर १७ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरसकट शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला होता. मात्र, पालक संघटना, शिक्षणतज्ज्ञ तसेच या संदर्भात नेमण्यात आलेला टास्क फोर्सने शाळा सुरू करण्याच्या बाजूनेच आपले मत नोंदविले होते. मुलांच्या भावनिक वाढीच्या दृष्टीने प्रत्यक्ष शाळा सुरू करणे आवश्यक असल्याचेच तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
ग्रामीण भागात शाळा सुरू करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना तर शहरी भागात महापालिका आयुक्तांना असणार आहेत. टास्क फोर्सने याबाबत नियमावली (एसओपी) तयार केल्या असून त्यांची विस्तृत माहिती लवकरच देण्यात येईल. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनी लसींचे दोन्ही डोस घेतलेले असणे आवश्यक असणार आहे. एखादा विद्यार्थी जर आजारी असेल, त्याला आजाराची लक्षणे दिसत असतील तर तातडीने उपचार करण्यात येणार आहेत, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
ज्या पालकांची मुले शाळेत जाणार असतील अशा पालकांनाही कोणती काळजी घ्यायची याच्या सूचना देण्यात येणार आहेत. मुलांना गणवेशाची सक्ती न करता घरच्या कपड्यांवरही शाळेत जाता येणार आहे. मुले घरी आल्यानंतर त्यांचे कपडे बदलून आंघोळ घालणे आदी सुरक्षा विषयक सूचना पालकांना देण्यात येतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिली. 4 ऑक्टोबरपासून प्रत्यक्षात सुरू होणार शाळांमुळे दीड वर्षांपासून विविध माध्यमातून सुरू असलेले ऑनलाईन शिक्षण बंद करण्यात येणार आहे. शाळेत उपस्थित न राहणार्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गाची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना युट्यूब व अन्य माध्यमातील अन्य अभ्यासाच्या लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या लिंकच्या माध्यमातून पालकांनी स्वत: त्यांच्या पाल्यांचा अभ्यास करून घ्यावा लागणार आहे.
दरम्यान, ऑगस्ट महिन्यात शाळा सुरू करण्याचा एकदा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, तो स्थगित करण्यात आला. राज्यात तिसरी लाट येण्याची भीती देखील वर्तविण्यात येत होती. मात्र, आता गणेशोत्सव पार पडल्यानंतर सुदैवाने रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात कुठे वाढ झालेली दिसून आलेली नाही. रूग्णसंख्याही कमी होते आहे. राज्याचा रूग्ण रिकव्हरी रेटही ९७ टक्क्यांपर्यंत आहे. बहुतांश ठिकाणी लसीकरण झालेले आहे. अनेकांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी आधीपासूनच प्रयत्न करण्यात आले होते. त्यामुळे राज्य सरकारने शाळा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.
…..शाळेची घंटा वाजताना
मुलांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांची संमती आवश्यक
विद्यार्थ्यांना शाळेची उपस्थिती बंधनकारक नाही
शिक्षक आसनी शिक्षकेतर कर्मचार्यांना लसीचे दोन्ही डोस घ्यावे लागणार
शाळेत शारीरिक अंतरासह कोरोना विषयक सर्व नियम पाळावे लागणार