मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह डझनभरहून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. याच बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले, आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात नवं सरकार स्थापन झालं. राज्यात एकीकडे राजकीय घडामोडी वेगाने सुरु असताना दुसरीकडे मुसळधार पावसाचे संकट निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील अनके राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासैनिकांना नवे आवाहन केले आहे. राजकीय परिस्थितीकडे लक्ष न देता युवासैनिकांनी पूरग्रस्त भागत मदत करावी असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून हे आवाहन केलेय.
युवासैनिकांनो! आताच्या राजकीय परिस्थितीकडे लक्ष न देता, जिथे जिथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे अशा भागात शक्य असेल ती मदत पोहोचवा, मदत कार्य करा… सर्व सामान्य जनता अजूनही आपल्याकडेच आशेने पाहत आहे… जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याची “हीच ती वेळ”, अस ट्विट करत आदित्य ठाकरेंनी युवासैनिकांना मदतीचे आवाहन केले आहे. यामुळे राजकारणात आमदारांनी केलेल्या दगाबाजीनंतर आदित्य ठाकरे आता समाजकारणातून जनतेचे लक्ष केंद्रित करत असल्याची चर्चा रंगत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंचे हे ट्विटही आता चर्चेचा विषय ठरतेय.
युवासैनिकांनो!
आताच्या राजकीय परिस्थितीकडे लक्ष न देता, जिथे जिथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे अशा भागात शक्य असेल ती मदत पोहोचवा, मदत कार्य करा… सर्व सामान्य जनता अजूनही आपल्याकडेच आशेने पाहत आहे… जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याची “हीच ती वेळ”.— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 16, 2022
राज्यात गेल्या आठवड्याभरापासून मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, कोकण, नाशिक, कोल्हापूर, मराठवाड्यासह अनेक भागात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नदी, तलाव, बंधारे पाण्याखाली गेलेत. यामुळे मोठ्याप्रमाणात पिकांचे नुकसान झाले. दरम्यान पुरातही अनेक जण वाहून गेल्याच्या घटना घडल्या. तर 120 हून अधिक नागरिकांचा बळी गेला, दरम्यान पिकांचे नुकसानामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यात अनेक जिल्ह्यात अद्याप महसूल कर्मचारी पंचनाम्यासाठी न आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे सरकारकडून लवकराच लवकर मदत जाहीर व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.