ऐन कोरोना संकटात राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. यात हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरीस सोलापूर, सांगलीतील विविध ठिकाणी पुढील चार दिवस विजांचा गडगडासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी सिंधुदुर्गात वादळी वाऱ्यासह विजांचा लखलखाटात अवकाळी पाऊसाने सुरुवात केली. यामुळे कुडाळ, कणकवली, वैभववाडी तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले. तर वादळी वाऱ्यांमुळे फळ बागांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान हवामान विभागाने राज्यात पाऊस व काही ठिकाणी गारपीठ होण्याचाही अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे, त्यामुळे मुंबई, ठाण्यासारख्या शहरांमध्ये उन्हाचा तडाखा आणखी वाढला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ आणि केरळदरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ, कोकणात पावसाचं वातावरण तयार होत आहे. यात उष्णताही वाढत असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे आजपासून अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरींना सुरुवात झाली आहे.
Severe weather warnings issued by IMD for coming 5 days in Maharashtra.@RMC_Mumbai @RMC_Nagpur pic.twitter.com/vkM8DoEE7p
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 8, 2021
तसेच अनेक जिल्ह्यांसाठी चार दिवस महत्त्वाचे असल्याचे सांगत राज्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच हवामान खात्याने काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडताना दिसतात. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ तसेच मराठवाड्यासह कोकणात पावसाच्या सरी बरसत आहेत. या पार्श्वभूमीवर आता येत्या १ जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. सातारा, सागंली, कोल्हापूर, रत्नागिरी, हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यात पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस, विजांचा कडकडाट आणि गाराही पडण्य़ाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, १२ मेपर्यंत राज्यभर असंच वातावरण असणार आहे. सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आणखी आठवडाभर राज्यावर अवकाळी पावसाचं संकट असणार आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, लातूर, चंद्रपूर, गडचिरोली, बीड, उस्मानाबादच्या काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरूवात झाली असून काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि विजांचा गडगडाट होईल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.