राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आजही राज्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर अंदमान आणि निकोबार, अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून मान्सूनचा प्रवास पुढे सरकला आहे. हा पाऊस महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर कधी येईल आणि उकाड्यापासून सुटका कधी होईल? अशी प्रतीक्षा मुंंबईकरांकडून केली जात आहे.
मुंबईत तापमानाची नोंद काय?
मागील दोन दिवस मुंबईचे कमाल तापमान ३४ ते ३५ अंशांदरम्यानपर्यंत होते. सांताक्रूझ येथे काल(मंगळवार) ३४.६ तर कुलाबा येथे ३४.२ अंश सेल्सिअस तापमान होते. सोमवारी हे तापमान सांताक्रूझ आणि कुलाबा या दोन्ही ठिकाणी ३४.४ होते. तसेच कुलाबा येथे ६८ टक्के आणि सांताक्रूझ येथे ६२ टक्के आर्द्रता होती. मुंबई विमानतळ येथे ३४.२, महालक्ष्मी येथे ३४.७, राम मंदिर येथे ३६.४, आणि मिरा रोड येथे ३६.६ अशा तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
वाऱ्याची दिशा बदलण्याची शक्यता
काल वाऱ्यांची दिशा उत्तरेकडून होती. तर जमिनीवरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमान आणि आर्द्रता कमी असली तरी उकाडा मात्र अधिक जाणवत होता. पुढील दोन दिवसांत वाऱ्याची दिशा बदलण्याची शक्यता आहे. वायव्येकडूनही वारे वाहतील. पण हे वारे उत्तर आणि वायव्य दिशेकडून वाहत असल्याने अस्वस्थता कमी होण्याची शक्यता फारच कमी आहे.
या आठवड्यात मराठवाड्यावरून जाणारा पश्चिमी प्रकोप आणि ढगांची द्रोणीय स्थिती यामुळे मागील दोन दिवसांत राज्यात काही भागांमध्ये पाऊस पडला. तर राज्यातील काही ठिकाणी गाराही पडल्या. येत्या ५ जून रोजी अरबी समुद्रात एक प्रणाली तयार होत असून त्यामुळे मान्सूनपूर्व सरी अनुभवता येतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
रविवारी हिंगोली, भंडारा, गोंदिया, नागपूरसह इतर काही भागांध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला. राज्याच्या सर्वच भागांत कमाल तापमानाचा पारा ४० ते ४५ अंशांच्या आसपास पोहचला. त्यामुळे गेल्या तीन आठवड्यांपासून कडक उन्हामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहे. पण त्यांना आता दिलासा मिळणार आहे. कारण पुणे वेधशाळेने इशारा पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. त्यामुळे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांत पुढील तीन दिवस अवकाळी पाऊस बरसणार आहे. त्यामुळे तापमानाचा पारा ४० अंशांपर्यंत घसरू शकतो, असे हवामान विभागाने सांगितले आहे.