मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या तापमानात विविध बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. रात्री गारवा तर दिवसा उन्हाचे चटके यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सध्या मुंबई व राज्याच्या इतर भागांमध्ये गारवा अनुभवायला मिळत आहे. पण येत्या 48 तासांमध्ये किमान तापमानात दोन ते चार अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, हिमाचल प्रदेश, राजस्थान पंजाब या राज्यात दोन दिवस कडाक्याच्या थंडीसह प्रचंड गारठा जाणवणार आहे. तर दक्षिणेत तमिळनाडू, केरळ भागात पावसाला पुन्हा एकदा पोषक वातावरण तयार झाले आहे. (Maharashtra Weather Meteorological department predicts that cold weather will disappear in state and temperature will increase)
हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, राज्यात गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात काही अंशांनी घट पाहायला मिळत आहे. राज्यात कोरड्या व शुष्क वाऱ्यांचा प्रभाव सक्रिय असल्याने पहाटे प्रचंड गारठा आणि थंडीचा जोर वाढला आहे. तर दुपारी उन्हाचे चटके जाणवत आहेत. राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा घसरला होता. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून 17 ते 18 अंश असणारे तापमान 15 ते 16 अंशावर आले होते. बहुतांश मध्य महाराष्ट्रातही किमान तापमानाचा पारा 13 ते 20 अंशापर्यंत स्थिरावल्याची नोंद झाली. कमाल तापमानात चांगलीच वाढ पाहायला मिळाली. बहुतांश राज्यात तापमानाचा पारा 29 अंशापासून 38 अंशापर्यंत होता.
प्रादेशिक हवामान केंद्रांना दिलेल्या अंदाजानुसार, कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या चार ते पाच दिवसात कमाल तापमानातही 2 ते 3 अंशाने वाढ होणार आहे. येत्या दोन दिवसात किमान तापमान फारसे बदलणार नाही. त्यानंतर त्यात बदल होतील. विदर्भात येत्या तीन दिवसात कमाल व किमान तापमान त्यानंतर दोन ते तीन अंशांची घट होणार आहे. कोकणात कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस होते, तर ठाणे पालघर जिल्ह्यात 26 अंश सेल्सिअस पर्यंत पारा गेला होता. दरम्यान, सुर्याचे उत्तरायण सुरू असून दिवस मोठा आणि रात्र छोटी होत जाणार आहे. मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र मध्य व पूर्व विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात कमाल तापमानाचा पारा 33 ते 34 अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे. आकाश निरभ्र राहणार असून येत्या दोन दिवसात किमान तापमानात दोन ते तीन अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. दोन दिवस राज्यातील कमाल व किमान तापमानात फारसा बदल नसला तरी या आठवड्यात तापमानात चढ-उतार जाणवणार आहे.