नागपूर येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप शुक्रवारी वाजणार आहे. संसदीय कामकाज सल्लागार बुधवारच्या बैठकीत येत्या २९ आणि ३० डिसेंबरचे दोन्ही सभागृहातील कामकाज निश्चित करण्यात आले. त्यानुसार शुक्रवार हा अधिवेशनाचा शेवटचा दिवस असणार आहे.
आज विधानभवनात संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत गुरुवारी शासकीय कामकाज आणि अंतिम आठवडा प्रस्ताव तर शुक्रवारी शासकीय, अशासकीय आणि विधेयके घेण्याचा निर्णय घेण्यात आला. संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या निर्णयाची माहिती सभागृहाला दिली. दरम्यान, विरोधी पक्षाने हिवाळी अधिवेशनाचे कामकाज तीन आठवडे चालवावे, अशी मागणी केली होती. मात्र, सरकारने ही मागणी मान्य केली नाही.
19 डिसेंबरपासून राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. यात मुंबई, विदर्भ, मराठावाड्याचे अनेक विषयांवर चर्चा सुरु झाली आहे. मात्र अधिवेशनाचा कालावधी अपुरा असल्याने कालावधी वाढ करण्याची मागणी अधिवेशनाच्या सुरुवातीपासून विरोधकांकडून केली जात होती. मात्र या अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनचं नेत्यांचे घोटाळे, त्यांच्यावरचे आरोप-प्रत्यारोप या विषयांवरचं मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. त्यामुळे जनतेचे मुख्य प्रश्न मागे पडल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे.
यापार्श्वभूमीवर नागपूर कराराप्रमाणे अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. मात्र कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ही मागणी फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे समितीच्या निर्णयाप्रमाणे हिवाळी अधिवेशन 30 तारखेलाच संपणार आहे. उद्या म्हणजे गुरुवारी अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार आहे.