मुंबई – राज्यात हिवाळ्याला (Maharashtra Winter) सुरुवात झाली असून आज सकाळपासून हुडहुडी सुरू झाली आहे. यंदा परतीचा पाऊस उशिराने गेला. त्यामुळे ऑक्टोबर हिटचा तडाखा फार जाणवला नाही. परंतु, थंडीलाही उशिरानेही सुरुवात झाली. नोव्हेंबरचा दुसरा आठवडा सुरू झाला असून आजपासून राज्यभरातील विविध जिल्ह्यांत थंडी जाणवायला सुरुवात झाली आहे. तर, मुंबईतही तापमान घसरले आहे.
हेही वाचा – फॅशनेबल स्वेटर वापरा,थंडीतही हटके लूक ठेवा
पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या ठिकाणी थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत थंडीच्या लाटेचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, अहमदनगर जिल्ह्यातील काही ठिकाणी तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे येणाऱ्या थंडीसाठी शाल, स्वेटर तयार ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईतही २० अंशांच्या खाली तापमान नोंदवले गेले आहे. पुढील १० ते १२ दिवस थंडी वाढणार असून २३ ते २६ नोव्हेंबर दरम्यान तापमानत किंचित वाढ होऊ शकते. सध्या इशान्य दिशेकडून वाऱ्यांचा प्रभाव जाणवत असल्याने तापमानात घट होत असल्याची माहिती वेध शाळेने दिली.
रविवारी किती तापमान नोंदवले (तापमान अंश सेल्सिअसमध्ये)
- जळवाग ८.५
- औरंगाबाद ९.२
- पुणे ९.७
- महाबळेश्वर १०.६
- सातारा १२.६
- उदगीर १०.८
- परभणी ११.५
- यवतमाळ १०
- गोंदिया १०.४
- नागपूर ११.४
- अमरावती ११.७