घरमहाराष्ट्रMaharashtra ZP By-Elections Results : जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा

Maharashtra ZP By-Elections Results : जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा

Subscribe

काँग्रेस १९ तर राष्ट्रवादी १५ जागांवर विजयी

राज्यातील सहा जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक म्हणजे २२ जागा जिंकल्या आहेत. या पोटनिवडणुकीत काँग्रेस दुसऱ्या तर राष्ट्रवादी तिसऱ्या स्थानी असून शिवसेना चौथ्या स्थानावर फेकली गेली आहे. पालघरसह धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या सहा जिल्हा परिषदांतील ८५ तर त्यांतर्गतच्या ३८ पंचायत समित्यांतील १४१ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी काल, मंगळवारी मतदान झाले होते. या पोटनिवडणुकीची मतमोजणी बुधवारी होऊननिकाल जाहीर करण्यात आले.

जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसला १९, राष्ट्रवादी काँग्रेसला १५ तर शिवसेनेला १२ जागा मिळाल्या आहेत. १२ ठिकाणी नोंदणीकृत पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. तर चार जागांवर अपक्षांनी बाजी मारली आहे.

- Advertisement -

दरम्यान, भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादीने जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत आपलाच पक्ष अव्वल ठरल्याचा दावा केला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सहा जिल्ह्यातील पोटनिवडणुकीत भाजप राज्यातील क्रमांक एकचा पक्ष म्हणून विजयी झाल्याचा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

या निकालाच्या तपशीलात गेले तर जिल्हा परिषद, पंचायत समिती मिळून २५ टक्के जागा भाजपाला तर २५ टक्के जागा अपक्ष आणि छोट्या पक्षांना मिळाल्या आहेत. उरलेल्या ५० टक्क्यात महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष सामावले आहेत. शिवसेनेच्या बळावर कोण मोठे होते आहे आणि शिवसेना कशी अधिकाधिक रसातळाला जात आहे, हेच या निवडणुकीतून दिसून येते आहे. भाजपचा जनाधार सातत्याने वाढतो आहे आणि इतरांचा जनाधार कमी होतो आहे. शिवसेना तर आणखी खाली जाते आहे. कोण रसातळाला जात आहे, हे या निवडणुकीने स्पष्ट झाले आहे, असे फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

पोटनिवडणुकीतील यश हे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ – नाना पटोले

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीत काँग्रेसला मिळालेले यश हे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्यांनी मेहनत घेतल्यानेच या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाची कामगिरी चांगली झाली असून ही तर सुरुवात आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

या यशामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये लढण्याची आणखी उर्जा निर्माण झाली असून महाराष्ट्रात पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला एक नंबरचा पक्ष करण्याचा निर्धार केला होता त्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. राज्यात आणि केंद्रात काँग्रेस हाच पर्याय आहे. काही लोक काँग्रेसला संपवायचा विचार सातत्याने करत असतात.त्यांना जनतेने या निकालातून चोख उत्तर दिलेले आहे, असे पटोले म्हणाले.

भाजपच्या विचारांना जनतेने नाकारले – जयंत पाटील

भाजपच्या विचारांना जनतेने नाकारले आहे हे या निकालामधून दिसते. यापुढील निवडणुकांमध्येदेखील जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूनेच लागेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या निकालात ८५ जागांपैकी जवळपास ४८ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने जवळपास १९ जागा जिंकल्याचा दावा पाटील यांनी केला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -