मुंबईतील ‘टाटा कॅन्सर’ रुग्णालयातील डॉक्टरांच्या बसला अहमदनगर शहराजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात ३० डॉक्टर जखमी झाले असून बसचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात शनिवारी पहाटे घडला असून जखमी डॉक्टरांना जवळच्या रुग्णालात दाखल करण्यात आले आहे.
नेमके काय घडले?
मुंबईतील ‘टाटा कॅन्सर’ आणि इतर रुग्णालयातील डॉक्टर मेडिकल कॉन्फरन्ससाठी औरंगाबादला निघाले होते. पहाटे त्यांची बस केडगाव येथे पोहोचली. त्याच दरम्यान केडगाव बायपास समोरुन येणाऱ्या भरधाव गाडीने डॉक्टरांच्या लक्झरी बसला धडक दिली. या धडकेत बसचा अक्षरश: चक्काचूर झाला असून या अपघातात बसचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या बसमध्ये एकूण ४० डॉक्टर होते. हे सर्व डॉक्टर मेडिकल कॉन्फरन्ससाठी निघाले असून सर्व डॉक्टर कॅन्सरतज्ञ असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात २५ डॉक्टर किरकोळ जखमी झाले असून डॉ. पुष्कर इंगळे, अनिल टिबडेवाल, जानी कार्टन हे डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अहमदनगरमधील मक्सकेअर हब खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.