माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर आणि निर्णय क्षमतेवर भाजपच्या अधिकृत व्यासपीठावरुन जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंच्या ’मातोश्री’ निवासस्थानी बड्या नेत्यांसह तरुण नेत्यांची पळापळ सुरू झाली. उद्धव ठाकरे यांनी आपल्या संकटमोचकांना आवताण धाडल्यावर मात्र प्रशासकीय अधिकारी आणि माध्यमांच्या प्रतिनिधींनी ‘सावधान’ पवित्रा घेतला.
भाजपवासी झाल्यानंतर प्रथमच प्रदेश कार्यालयातून माध्यमांना अधिकृतपणे सामोरे जाणार्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर आणि नेतृत्व नेतृत्व क्षमतेवर तुफानी हल्ला चढवला. मुख्यमंत्री मातोश्रीच्या पिंजर्यात कैद झाले असल्याची टीका करताना मंत्रालयाचे नाव सचिवालय करायला हवे,अशा स्वरूपाची खोचक टीका राणे यांनी केली आणि त्यानंतर राजकीय चक्र वेगाने फिरायला सुरुवात झाली. नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांच्या बदलीला मिळालेली स्थगिती, मुंबईतील दोन किलोमीटरच्या परिघातील संचारबंदीला स्थगिती, आणि आयपीएस अधिकार्यांच्या बदल्यांनी झालेला गोंधळ यामुळे महविकास आघाडीतील शिवसेना- राष्ट्रवादी यांच्यातील गोंधळ चव्हाट्यावर आला. या सगळ्यातून उद्धव ठाकरेंना प्रशासकीय पातळीवर आलेले अपयश आणि त्यातून सरकारी निर्णयाचा उडालेला बोजवारा सुरु असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या पाच सेनेतील नगरसेवक उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत सहभागी झाले. त्याआधी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी अंबरनाथ मधील राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत घेतले. पारनेरच्या पाच नगरसेवकांना पुन्हा पक्षात पाठविण्यासाठी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी अजित पवार यांची मनधरणी सुरु केली. पण त्याला यश येणे कठीण वाटू लागल्याने काही तासात शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मातोश्रीला भेट दिली. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री ठाकरे यांनी संकटमोचक एकनाथ शिंदे आणि खास मर्जीतील सुभाष देसाई यांना मातोश्रीवर बोलावून घेतले. त्यापाठोपाठ पवारांचे विश्वासू जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार हे देखील मातोश्रीवर डेरेदाखल झाले. कोरोनाने आधीच हादरुन गेलेले ठाकरे सरकार या नेत्यांच्या पळापळीने अधिकच आचके द्यायला लागले. नेत्यांच्या या लगीनघाईत प्रशासकीय अधिकारी आणि माध्यमाच्या प्रतिनिधी श्वास कोंडून आपल्या नजरा मातोश्रीवर रोखल्या.
Dear Uddhavji, In the 5 years of @BJP4India & @ShivSena rule in Maharashtra, I always kept the balance and never let you down. You & family have always treated me as a family member & it’s same now also. My 1st personal tweet for our friendship. ?. @AUThackeray @Dev_Fadnavis
— Niraj (@NirajGunde) July 6, 2020
या सगळ्या राजकीय नाट्याला बदल्या हे कारण ठरले आहे. प्रत्यक्षात भाजपनेते आशिष शेलार यांनी शनिवारी शरद पवारांची वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये मुंबई क्रिकेटच्या विषयक कामानिमित्त भेट घेतली. त्यानंतर खरी राजकीय फटकेबाजी सुरु झाली. त्यानंतरच नारायण राणे पार्टी पिच वरुन फटकेबाजीला उतरण्याची योजना ठरली. या सगळ्यात कडी केली ती बिल्डर निरज गुंडे यांनी. त्यांनी फडणवीस- ठाकरे यांच्या ’दोस्ती’ वर ट्विट केलं आणि धमाल उडवली.