महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद, छत्रपती शिवाजी महाराज आणि विविध महापुरुषांबाबतची वादग्रस्त विधाने, राज्यपालांना पदावरून पायउतार करणे आणि राज्याबाहेर जाणारे उद्योग धंदे याविषयांना धरून आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीत आज महाविकास आघाडी आणि मित्र पक्ष 17 डिसेंबरला मुंबईत महामोर्चा काढणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा हा मोर्चा काढला जाणार आहे. यासाठी 8 डिसेंबरला या मोर्चाबाबत मविआ आणि मित्र पक्षांची मोर्चाच्या आखणीबाबत एक आढावा बैठक होणार आहे. दरम्यान 8 ते 17 डिसेंबरदरम्यान राज्यपालांना पदावरून हटवण्यात आले तरी मविआचा हा विराट मोर्चा निघणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
आज झालेल्या बैठकीनंतर सर्वप्रथम उद्धव ठाकरे यांनी माध्यमांसमोर आजच्या बैठकीतील मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, आमच्यासोबतचे जे मित्र पक्ष आहेत. अजित पवार, बाळासाहेब थोरात यांनी देखील चर्चा केली. या सर्वांनी एकजूट दाखवण्याची हीच वेळ आहे, असं मान्य केलं आहे. एकजूट दाखवण्यासाठी येत्या १९ तारखेपासून विधानसभेचं अधिवेशन नागपूरमध्ये सुरू होणार आहे. या १९ तारखेच्या आधी १७ तारखेला मुंबईमध्ये महाविकास आघाडीचाच नव्हे तर मी सर्वांना विनंती करतोय की, ज्यांना महाराष्ट्राचा अपमान सहन होत नाही. त्या सर्वांना मी आमंत्रण देतोय की, चला आपण महाराष्ट्र म्हणजे काय?, महाराष्ट्राच्या एकजुटीचा आणि स्वाभिमानाचा, शक्तीचं एक विराट दर्शन या महाराष्ट्र द्वेष्टाने दाखवूया. १७ तारखेला सकाळी ११ वाजता जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा एक अतिभव्य मोर्चा महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही काढत आहोत. या महामोर्च्यात महाराष्ट्रप्रेमींनी सहभागी व्हावं, असं आवाहन ठाकरे यांनी केलं.
गुजरातची निवडणूक जिंकावी म्हणून महाराष्ट्रातले उद्योग त्यांनी गुजरातला पळवले. तसेच येत्या काही महिन्यांमध्ये कर्नाटकच्या निवडणुका येणार आहेत. त्यामुळे कर्नाटकातील निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्रातील ही गावं खरोखर तोडणार आहेत का?, मुख्यमंत्री महाराष्ट्राला आहेत हे कळणार कधी, आज कर्नाटकात आपले काही मंत्री जाणार होते, असं मी ऐकलं होतं. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी इशारा दिल्यानंतर त्यांचा दौरा रद्द झाला. हा एवढा नेभळट महाराष्ट्र कधीही कुणीही पाहिलेला नव्हता. हे नेभळट सरकार म्हणजे महाराष्ट्र नव्हे हे सांगण्याची आता वेळ आली आहे. असही उद्धव ठाकरे म्हणाले.