घरमहाराष्ट्रपोलीस विभागात मोठे फेरबदल; परमबीर सिंहांच्या जागी बी. के. उपाध्याय होमगार्डचे महासंचालक

पोलीस विभागात मोठे फेरबदल; परमबीर सिंहांच्या जागी बी. के. उपाध्याय होमगार्डचे महासंचालक

Subscribe

विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपूर्वी परमबीर सिंह यांना महाराष्ट्र होमगार्डचे प्रमुख करण्यात आले होते, पण ते ड्युटीवर हजर झाले नव्हते. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी 29 ऑगस्टपर्यंत रजा घेतली होती, मात्र त्यानंतरही ते कर्तव्यावर परतले नाहीत. दरम्यानच्या काळात त्यांचा पदभार नागरी संरक्षण विभागाचे पोलीस महासंचालक के. वेंकटेशम यांच्याकडे देण्यात आला होता.

मुंबईः राज्यातील पोलीस विभागात पुन्हा एकदा मोठे फेरबदल करण्यात आलेत. दोन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची आज बदली करण्यात आलीय. वरिष्ठ आयपीएस अधिकारी बी. के. उपाध्याय म्हणजेच डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांना बढती देण्यात आली असून, ते आता गृहरक्षक दलाचे पोलीस महासंचालक असतील. बी. के. उपाध्याय यांची परमबीर सिंहांच्या जागी नियुक्ती करीत त्यांना पोलीस महासंचालकपदी बढती देण्यात आलीय. महाराष्ट्र शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी राज्यपालांच्या आदेशानुसार वरिष्ठ आयपीएस अधिकारी बी. के. उपाध्याय यांच्या नियुक्तीचे 20 जानेवारीला आदेश काढलेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे परमबीर सिंहांना अद्याप कोणतीही बदली मिळालेली नाही.

विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपूर्वी परमबीर सिंग यांना महाराष्ट्र होमगार्डचे प्रमुख करण्यात आले होते, पण ते ड्युटीवर हजर झाले नव्हते. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी 29 ऑगस्टपर्यंत रजा घेतली होती, मात्र त्यानंतरही ते कर्तव्यावर परतले नाहीत. दरम्यानच्या काळात त्यांचा पदभार नागरी संरक्षण विभागाचे पोलीस महासंचालक के. वेंकटेशम यांच्याकडे देण्यात आला होता. मार्चमध्ये परमबीर सिंह यांनी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर आणि भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतरच त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या.

- Advertisement -

विशेष म्हणजे महाराष्ट्र सरकारने काही दिवसांपूर्वी आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांना निलंबित करून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरू केली होती. मुख्यमंत्र्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच त्यांनी 12 नोव्हेंबर रोजी परमबीर सिंहांच्या निलंबनाच्या आदेशावर स्वाक्षरी केली होती. यासोबतच ठाणे शहराचे तत्कालीन डीएसपी पराग मणेरे यांनाही निलंबित करण्यात आले होते. आता परमबीर सिंहांच्या जागी बी. के. उपाध्याय यांना पोलीस महासंचालकपदी बढती देण्यात आल्यानं हा चर्चेचा विषय ठरत आहे.

विविध ठिकाणी खंडणीचे पाच गुन्हे!

अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्याकांडानंतर परमबीर सिंह यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करीत खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर परमबीर सिंह यांच्याविरोधातही तक्रारी येऊ लागल्या होत्या. मुंबई आणि इतर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर खंडणीचे पाच गुन्हे दाखल आहेत. यानंतर अटकेच्या भीतीने आजारी असल्याचे कारण दाखवत मे महिन्यात ते सुट्टीवर गेले होते. चौकशीसाठी समन्स पाठवूनदेखील ते हजर राहत नव्हते. तपास यंत्रणांच्या रडारवरूनही ते दिसेनासे झाल्याने न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले होते. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर ते प्रकटले होते.

- Advertisement -

हेही वाचाः Republic Day : PHOTO | मुंबईत प्रजासत्ताक दिनाची जय्यत तयारी

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -