Kasaba- Chinchwad By election | पुणे – पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांचे निधन झाले आहे. त्यामुळे या जागा रिकाम्या झाल्या असून येथे पोटनिवडणुका लागल्या आहेत. या निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणीही सुरू झाली आहे. या मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही उमेदवार उभे करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध होण्याकरता महाविकास आघाडीला पत्र लिहिले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या आज ते गाठीभेटी घेणार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडूनही आज उमेदवार जाहीर होण्याची शक्यता होती. परंतु, आज त्यांनीच ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी केल्याने मनसे या निवडणुकीतून बॅकफुटला गेली आहे. राज ठाकरेंनी लिहिलेल्या पत्राचा महाविकास आघाडीतील नेते सकारात्मक विचार करतील का हे पाहावं लागणार आहे.
राज ठाकरेंनी पत्रात काय म्हटलं आहे?
महाराष्ट्र विधानसभेच्या २ आमदारांचं नुकतंच दुःखद निधन झालं. ह्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिडणूका होत आहेत. मी अगदी सुरुवातीपासून ह्या मताचा आहे की, जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी.
कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षाला देखील असतो. अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो, अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर, त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एक प्रकारे, राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला श्रद्धांजलीच ठरणार नाही का? आणि ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही. अर्थात उमेदवार जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातील नसेल तर, जनता देखील सहानभूती दाखवेलच असं नाही.
अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस, दिवंगत आमदार रमेश लटके ह्यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या, त्यावेळेस मी श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना निवडणूक बिनविरोध करण्याचं आव्हान केलं होतं. ज्याला सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांनी ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली.
आता पुन्हा पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत. जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वाना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दुःखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात ही इच्छा.
राज ठाकरेंच्या पत्राने संभ्रम
“जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षाला देखील असतो,” असं म्हणतानाच राज ठाकरे म्हणाले की, उमेदवार जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातील नसेल तर, जनता देखील सहानभूती दाखवेलच असं नाही.” त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात आता नवी चर्चा रंगली आहे.
अंधेरीत काय घडलं होतं?
अंधेरी पोटनिवडणुकीवेळीही राज ठाकरेंनी पुढाकार घेऊन बिनविरोध निवडणुकीचे आवाहन केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनीही बिनविरोध निवडणुकीसाठी भाजपाकडे मागणी केली होती. राज ठाकरे आणि शरद पवारांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून भाजपाने उभा केलेला उमेदवार मागे घेतला होता. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडी राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे उमेदपणा घेऊन उमेदवार मागे घेतात का हे पाहावं लागेल.