पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी टीका करत रोजगार पळवून नेण्यासाठी गुप्त बैठका घेतल्या जात असल्याचा आरोप केला. याला आता शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईतून आंतरराष्ट्रीय वित्त केंद्र गुजरातला पळवून नेलं तेव्हा भाजपचे बोलभीडू शेपूट घालून का बसले? अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केली.
संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. भाजपचं मुंबई प्रेम हे बेगडी असल्याची टीका संजय राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे. “ममता बॅनर्जी मुंबईत उद्योगपतींना भेटायला आल्या तर पोटशूळ उठला. म्हणे मुंबईतील उद्योग पळवायला आल्यात. आज Vibrant Gujarat साठी गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत अर्धे मंत्रिमंडळ घेऊन आले आहेत? मुंबईत त्यांचा रोड शो होतोय. आत्मनिर्भर गुजरात मुंबईला ओरबाडून,” असं राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
भाजपचे बेगडी मुंबई प्रेम.
ममता बॅनर्जी मुंबईत उद्योगपतीना भेटायला आल्या तर पोटशूळ उठला. म्हणे मुंबईतील उद्योग पळवायला आल्यात.आज vibrant Gujarat साठी गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत अर्धे मंत्रिमंडळ घेऊन आले आहेत? मुंबईत त्यांचा रोड शो होतोय.आत्मनिर्भर गुजरात मुंबईला ओरबाडून. pic.twitter.com/ezOw7tz7Os
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 2, 2021
तसंच, राऊत यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी भाजपर जहरी टीका केली आहे. “मुंबईतून आंतरराष्ट्रीय वित्त केंद्र गुजरातला पळवून नेलं तेव्हा भाजपचे बोलभीडू शेपूट घालून का बसले? योगी आदित्यनाथ मुंबईतील सिने उद्योग उत्तर प्रदेशात खेचण्यासाठी शर्थ करीत आहेत.. ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यावर टीका करण्याआधी आपल्या खाली किती टाके पडले आहेत ते पहा,” अस सणसणीत उत्तर संजय राऊत यांनी भाजप आणि अॅड. आशिष शेलार यांना दिलं आहे.
मुंबईतून international finance centre गुजरातला पळवून नेले तेव्हा भाजपचे बोलभीडू शेपूट घालून का बसले? योगी आदित्यनाथ मुंबईतील सिने उद्योग उत्तर प्रदेशात खेचण्यासाठी शर्थ करीत आहेत.. ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यावर टीका करण्याआधी आपल्या खाली किती टाके पडले आहेत ते पहा.. pic.twitter.com/NNulmHch3F
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 2, 2021