जालना: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 24 फेब्रुवारी ते 3 मार्च असं रास्ता रोको आंदोलन पुकारलं आहे. त्यासाठी त्यांनी आज पत्रकार परिषद घेत मराठा समाजाला रास्ता रोको करण्याचे आवाहनही केले. त्यानंतर आता मात्र त्यांनी मोठा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे, कारण आहे बारावीच्या परीक्षा. विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्याने, जरांगेंनी रास्ता रोकोमध्ये थोडा बदल केला आहे. (Manoj Jarange Changes in Manoj Jarange s Rasta Roko Movement The next direction will be on February 25)
असं असणार रास्ता रोको आंदोलन
मराठा आंदोलक राज्यभर रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. ठरल्याप्रमाणे शनिवारी सकाळी साडेदहा ते दुपारी एक असे आंदोलन होणार आहे. या आंदोलनावेळी बारावीच्या कुठल्याही विद्यार्थ्यांना अडचण नको. मुलींना कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यांना परीक्षास्थळापर्यंत पोहोचू देणं हे मराठा समाजाचं कर्तव्य असणार आहे. त्यामुळे हे आंदोलन सकाळी 11 वाजता सुरू करावे, असं जरांगेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, हे आंदोलन 3 मार्चपर्यंत होणार होतं. यात मात्र आता बदल करण्यात आला आहे. शनिवारचा रास्ता रोको झाल्यानंतर लगेच याचे रुपांतर धरणे आंदोलनात करण्यात आले आहे. 25 फेब्रुवारीपासून गावागावांतील ग्रामपंचायत, तलाठी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान राज्यभर संत रोहिदास यांची जयंती आहे. त्यासाठी चर्मकार बांधवांनी जोरदार तयारी केली आहे. तसंच नाशिकमध्ये बंजारा बांधवांचा उत्सव आहे. त्यासाठी राज्यभरातून लोक येणार आहेत. यांसह विविध समाजाची निवेदने जरांगेंना मिळाली आहेत. त्यावर ते म्हणाले, रास्ता रोको असला तरी मोठा भाऊ या नात्याने मराठ्यांकडून कुठल्याही समाजाला त्यांच्या कार्यक्रमासाठी अडचण येणार नाही. मराठा आंदोलक तुम्हाला वाट मोकळी करून देतील, असा शब्दही जरांगे पाटील यांनी सांगितलं.
(हेही वाचा: NCP MLA: जयंत पाटलांचे भाचे प्राजक्त तनपुरेंनी अखेर मनातलं सांगितलं; भाजपा प्रवेशावर केलं मोठं वक्तव्य)