बोईसर – पालघर जिल्यात बोईसर मध्ये मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी (ता.21) सायंकाळी बोईसरच्या सर्कस ग्राऊंडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याकरिता पालघर जिल्यातील सकल मराठा समाज अतिशय उत्साहात असून वसई , विरार , सफाले, पालघर , डहाणू, मोखाडा , तलासरी , वाडा ,विक्रमगड ,जव्हार भागातून सकल मराठा समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. जरांगे पाटील यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी आणि क्रेनद्वारे हार टाकला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या सभेला पाच हजारांहून अधिक मराठा समाज बांधव उपस्थित राहाणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. सभेसाठी अडीच एकर जागेची साफसफाई केली आहे. स्वयंसेवक म्हणून 200 पुरुष आणि 50 महिला स्वयंसेवक सज्ज असणार असल्याचे सकल मराठा समाजाचे वरिष्ठ नेते संतोष मराठे यांनी सांगितले आहे.
वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी बोईसर परिसरातील लोकांनी स्वतःचे वाहने आणू नयेत, त्यांनी पायी चालत यावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. महत्वाची वाहने ही सर्कस मैदानात एका बाजूने आणि तालुक्यातील वाहनांची व्यवस्था बसस्थानक, दुसरीकडे खोदराम बाग, डॉन बोस्कोकडे, तसेच काही वाहने सिडको मंदिराकडे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारकडून फक्त आश्वासन दिले असल्याने मराठा समाजात असंतोषाचे वातावरण आहे. अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्नावर आमरण उपोषणाच्या माध्यमातून आवाज बुलंद करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांच्या मागे महाराष्ट्र राज्यातील मराठा समाज उभा राहीला आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने गेली अनेक वर्ष शासनाकडे मागणी केली जात आहे. मराठा समाजाच्या मुलांना शैक्षणिक, नोकरीत आरक्षण मिळावी ही सकल मराठा समाजाची मागणी आहे.
मंचावर राजकीय नेत्यांना प्रवेश नाही
या सभेत फक्त मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांचेच मार्गदर्शनपर भाषण होणार आहे. सभेसाठी उभारण्यात येणाऱ्या मंचावर आयोजक आणि जरांगे पाटील यांच्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, असे आयोजकांनी म्हटले आहे. समाजातील राजकीय, सामाजिक नेते यांना मंचावर प्रवेश दिला जाणार नसल्याचे सकल मराठा समाजाने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले
ओबीसी हक्क परिषदेची भूमिका
आदिवासी आणि ओबीसींचा पालघर जिल्हा असल्याने मराठयांना सरसकट कुणबी आरक्षण देण्यास आमचा ठाम विरोध आहे. सरकारने मराठयांना वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्यावे. परंतु ओबीसींच्या आरक्षणाच्या हक्कात वाटेकरी सहन केला जाणार नाही. जरांगे पाटलांनी पालघरमध्ये येऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीची भूमिका मांडल्यास भूमिकेचा विरोध केला जाईल. अशी भूमिका ओबीसी हक्क परिषदेचे प्रवक्ते कुंदन संखे यांनी घेतली आहे.