मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग अजूनही कायम असून मराठा संघटना आता अधिकच आक्रमक झाल्या आहेत. १ ऑगस्टला तर सकल मराठा समाज आणि मराठी क्रांती मोर्चाच्यावतीने जेल भरो आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी मुख्यमंत्री आणि नारायण राणे यांच्यासोबत गेलेल्या समन्वयकांमध्ये चर्चा झाली. त्या चर्चेशी मराठा समाजाचा काही संबध नसल्याते सांगत. मुख्यमंत्री यांनी खोटी चर्चा घडवून आणण्यामागे मराठा आंदोलनामधे फूट पाडण्याचा डाव असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, मुख्यमंत्र्यांना राज्यात अराजकता ठेवण्यात जास्त रस आहे. म्हणून मराठा समाजाच्यावतीने चालू असलेल्या आंदोलनाची पुढील दिशा म्हणून १ अॉगस्टला जेल भरो आंदोलन होणारच, असा इशारा मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्यावतीने देण्यात आल्या आहेत.
कुठे आणि किती वाजता होणार जेल भरो आंदोलन –
संपूर्ण राज्यात १ ऑगस्ट रोजी हे जल भरो आंदोलन होणार असून, मुंबईमध्ये आझाद मैदानात सकाळी ११ वाजता या आंदोलनाला सुरूवात होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने देण्यात आली आहे.
काय आहेत आंदोलकांच्या मागण्या –
- २५ जुलै बंद दरम्यान दाखल केलेले सरसटक खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे.
- कळंबोली येथे महिलांवर केलेल्या बेछूट लाठीचार्ज आणि गोळीबार संदर्भात सदर अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी आणि त्यांना त्वरीत निलंबित करण्यात यावे.
- समाजासाठी ज्यांनी प्राण गमावला, त्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकी ५० लाख रुपये आणि जखमींना १० लाख रुपये देण्यात यावेत.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राम कदम यांनी मराठा समाजाविषयी जातीवाचक भाष्य करुन समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल आणि बंद दरम्यान झालेल्या हिंसेची जबाबदारी स्वीकारून समाजाची जाहिर माफी मागून राजीनामा द्यावा.
- तसेच बेताल वक्तव्य करणाऱ्यावर गुन्हे दाखल करावेत.