ओबीसी आरक्षणाबाबत तातडीने पावले उचलणाऱ्या राज्य सरकारला मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यास भाग पाडण्यासाठी आंदोलकांनी पुन्हा तयारी सुरु केली आहे. त्याचा भाग म्हणून मुंबईत येत्या २६ जून रोजी दादर येथील शिवाजी मंदिरच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये मराठा आरक्षण परिषद आयोजित करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकर सुटावा यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाने पुढाकार घेतला आहे. महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांच्या नेतृत्वात २६ जूनला सकाळी ११ वाजता विचारवंतांची परिषद भरविण्यात आली आहे. आरक्षणासाठी भव्य मूकमोर्चे काढूनही फायदा झाला नाही. न्यायालयाने मराठा आरक्षण देण्यास नकार दिल्यामुळे आता हा प्रश्न वेगळ्या पातळीवरून हाताळण्याचे महासंघाने ठरविले आहे.
या परिषदेत कायदेतज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या शिवाय इतरही विचारवंत संबोधित करणार असून मराठा समाजाला ओबीसी गटातून आरक्षण मिळावे, या मुद्दावर यापुढे भर दिला जाणार आहे. सध्याच्या ५० टक्के आरक्षणात अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी समाविष्ट आहेत. त्यामुळे आरक्षणाची टक्केवारी वाढवून मराठा बांधवांना आरक्षण द्यावे, अशी मागणी लावून धरण्यात येणार आहे.
राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न तापल्यास आघाडी सरकारची डोकेदुखी वाढणार आहे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. पदोन्नती आरक्षणाचे घोंगडे भिजत आहे. त्यात आता मराठा आरक्षणाची भर पडणार आहे.
हेही वाचा : शिवसेना – भाजपात उड्डाणपुलासाठी श्रेयवाद ; बॅनरबाजी, घोषणाबाजी आणि गोंधळात लोकार्पण