मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. केवळ राज्य सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. जर राज्यातील सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल, तर त्यांनी केंद्र सरकारला लोकसभा आणि राज्यसभेमध्ये विधायक आणायला सांगितले पाहिजे. जेणेकरून तातडीने मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. (Maratha Reservation : government is misleading Maratha community, Jitendra Awhad alleges)
हेही वाचा – INDIA वि. भारत वादाबाबत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले – “या अफवा…”
राज्य सरकारला जर मराठा समाजाला आरक्षण खरच द्यायचे असेल तर त्यांनी केंद्र सरकारला विशेष अधिवेशनामध्ये मराठा समाजाला 16% आरक्षणासंदर्भातील विधायक आणण्याचे म्हटले पाहिजे. परंतु राज्य सरकारकडून असे न करता केवळ मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. सुविधा एका संदर्भात राज्य सरकार चालढकलीचे काम करत आहे. यांना कोणालाच आरक्षण द्यायचे नाही आहे. मंडळ आयोगाने कुणबी समाजाला आरक्षण दिले होते, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, केंद्र सरकारकडून ‘इंडिया’ शब्द इतिहास जमा करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस, जिव्ह आ इंडिया, चक दे इंडिया चालते पण तुम्हाला इंडिया शब्द चालत नाही. यावरूनच समजते की केंद्र सरकार किती छोट्या मनाचे आहे. इंडिया आघाडीला देशभरात मिळत असलेल्या मोठ्या समर्थनामुळे केंद्रातील भाजपच्या नेत्यांची पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे त्यांनी इंडिया शब्द हा इतिहास जमा करण्याचे विधेयक विशेष अधिवेशनात आणणार असल्याचे म्हटले जात आहे. पण जर मी भारत नावाने पार्टी बनवली तर काय करणार आहात तुम्ही? भारत हा कधी देश नव्हताच आणि इंडिया हा देश कधी नव्हताच. जेव्हा बाबासाहेबांनी संविधान दिले तेव्हा हा देश तयार झाला आणि इंडिया नाव देण्यात आले, असेही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
देशातील मोदी सरकार हे एक कलमी कार्यक्रम राबवत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय देखील मोदी सरकारने बदलले आहे. दिल्ली सरकारचा अधिकार काढून घेण्याचा निर्णय देखील केंद्र सरकारने अध्यादेश आणून काढून घेतला आहे. भाजपला सोयीचे असेल अशा प्रकारे केंद्रातील सत्तेचा वापर करण्यात येत आहे. भाजपकडून देशाच्या संविधानाचे पाया काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
देशाच्या सर्वोच्च इमारतीचे आणि संविधानाच्या मंदिराचे उद्घाटन कुणाच्या हस्ते झाले? यावरून मनुवादी विचार दिसून येतात. संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्याकरिता आलेल्या त्या साधूंची नावे काय होती? हे नावे ऐकून प्राचीन युगात गेल्यासारखे वाटले होते. या संसद भवनाच्या उद्घाटनावेळी स्त्रियांबद्दल मनुस्मृती द्वेष दिसला आहे. मला हे मान्य नाही, मला सर्वसमावेशक हिंदू धर्म आम्हाला मान्य आहे. पण सनातन हिंदू धर्म मान्य नाही, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
एका खाजगी वृत्तवाहिनीने किरीट सोमय्या यांची बातमी लावली म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पण या व्हिडिओची चौकशी होणार होती त्याचे काय झाले? जे त्यांनी दाखवले त्याला त्यांनी दुजोरा दिला नाही. अशी बातमी लावली म्हणून संपादकावर गुन्हा दाखल होतो. हाच गुन्हा आहे. त्यांनी ही बातमी कुठून आणली आणि कशी आणली हा संविधानाने त्यांना दिलेला अधिकार आहे, असे देखील जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितले आहे.