खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणावरुन पुन्हा एकदा ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. मला नेत्यांना एकच विनंत करायची आहे की लोकांचा अंत पाहू नका, एकदा जर उद्रेक झाला तर त्याला कोण थांबवणार? हा उद्रेक नक्की होणार, असा इशारा उदयनराजे भोसले यांनी दिला. सातऱ्यात आज आण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती शिवेंद्रराजे भोसले एकाच मंचावर आले. यावेळी शिवेंद्रराजे आणि उदयनराजेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला. आण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनचे कार्य हे मराठा समाज एकत्र आणण्यासाठी होणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं हे सर्वांना मान्य करावं लागेल. आरक्षण न्यायालयातही टिकवलं होतं. मात्र राज्य सरकारला ते टिकवता आलं नाही, असं शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.
आण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्या उद्घाटनावेळी उदयन राजे भोसले यांनी राज्यातील ठाकरे सरकारला इशारा दिला. मला नेत्यांना एकच विनंती करायची आहे की लोकांचा अंत पाहू नका, एकादा जर उद्रेक झाला तर त्याला कोण थांबवणार. हा उद्रेक नक्की होणार. आपल्याकडे पुढची पिढी आशेनं बघत आहे, असं उदयनराजे भोसले म्हणाले. सर्वांना वाटतं मराठा समाज फार सधन आहे. मात्र, मराठा समाजातील मजुरांची, विद्यार्थ्यांची परिस्थिती फार वाईट आहे. दुसऱ्याचां लाभ काढून आम्हाला देऊ नका. पण सर्वांना न्याय दिला, मग आम्हाला का नाही? असा सवाल देखील उदयनराजेंनी केला.