नाशिकमध्ये होणार्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे नाव निश्चित करण्यासाठी रविवारी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत गंगापूर रोड येथील बालाजी लॉन्स येथे साहित्य महामंडळाची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. यात संमेलनाध्यक्षांचे नाव निश्चित होईल. अध्यक्षपदासाठी नावावर एकमत न झाल्यास आवाजी मतदानाद्वारे सर्वाधिक पसंती असलेल्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
रविवारी नाशिकमध्ये होणार्या बैठकीत महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, मुंबई साहित्य संघ मुंबई, मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद, विदर्भ साहित्य संघ नागपूर या चार घटक संस्था; तसेच छत्तीसगड, बडोदा, भोपाळ आणि गोवा या चार संलग्न संस्था, आंध्र प्रदेश व कर्नाटक या समाविष्ट संस्थांचे पदाधिकारी आणि संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी ११०० लोक मतदान करत होते. आता वेळप्रसंगी १९ लोक मतदान करतात. नवीन प्रक्रियेमुळे संस्थांना लॉबिंग करणे सोपे झाले आहे. एका नावावर मतैक्य झाले नाही; तर मतदान घ्यावे लागणार आहे. एका नावाला सर्वांनी होकार दर्शवला; तर निवडणुकीची गरज भासणार नाही. दुपारी ४ वाजेच्या सुमारास पत्रकार परिषदेत नव्या अध्यक्षांचे नाव जाहीर करण्यात येणार आहे.
ग्रंथ दालन व प्रदर्शन समिती गठीत
रविवारच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर साहित्य महामंडळाची शनिवारी (दि. २३) नियोजन बैठक कौतीकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात संमेलनाच्या रुपरेषेवर चर्चा करण्यात आली. तसेच ग्रंथ दालन व प्रदर्शन समिती गठीत करण्यात आली. या समितीत नाशिकमधील वसंत खैरनार व पंकज क्षेमकल्याणी यांची नियुक्ती करण्यात आली. या बैठकीस यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष कपूर वासनिक, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र साळुंके, मिलिंद जोशी, प्राचार्य उषा तांबे, विलास मानेकर, प्रदीप दाते यांच्यासह नाशिकमधील डॉ. हेमंत टकले, जयप्रकाश जातेगावकर, मुकूंद कुलकर्णी, शंकर बोराडे, सुभाष पाटील आदी उपस्थित होते.
साहित्यिकांची होणार कोरोना चाचणी
संमेलनासाठी बाहेर गावहून येणार्या साहित्यिकांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. यासाठी दातार लॅबचे सहकार्य लाभणार आहे.