जालना : मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र द्यावे, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी यासह इतर मागण्यांसाठी मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील शनिवारपासून ( 25 जानेवारी ) पुन्हा बेमुदत उपोषणाला बसले आहेत. उपोषणाच्या पाचव्या दिवशी जरांगे-पाटील सरकारवर भडकले आहेत. सरकार आमच्या मागण्या पूर्ण करणार आहे की नाही? असा संतप्त सवाल जरांगे-पाटील यांनी उपस्थित केला आहे.
पाच दिवस होऊनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही निर्णय घेतला नाही. आरक्षण देणार की नाही, हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे. अन्यथा आम्हाला पुढील दिशा ठरवता येईल, असा इशारा जरांगे-पाटील यांनी दिला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
हेही वाचा : ‘पालकमंत्रिपदा’वरून राडा सुरू असताना गोगावले अजितदादांच्या भेटीला; म्हणाले, झाले ते झाले, आता…
जरांगे-पाटील म्हणाले, “सरकार आमच्या मागण्या पूर्ण करणार आहे की नाही, हे त्यांनी सांगावे. अनेक लोक उपोषणाला बसले आहेत, आम्ही ज्या मागण्या केल्यात, त्या सरकार देणार आहेत की नाही? म्हणजे आम्ही आमच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवू. पाच दिवसानंतरही मुख्यमंत्र्यांनी काही निर्णय घेतला नाही. आरक्षण देणार की नाही, हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे. किंबहुना मी माझ्या मतावर ठाम आहे. त्यामुळे त्यांनी एकतर हो किंवा नाही म्हणून सांगावे. म्हणजे आम्ही पुढी दिशा ठरवू.”
“आमच्यासोबत बेइमानी केली, तर पाच वर्ष नीट सत्ता चालू देणार नाही. त्यामुळे आरक्षण देणार की नाही, हे सरकारनं स्पष्ट सांगून टाकावे. तुम्ही मराठ्यांना सुखाने खाऊन दिले नाही, तर तुम्हाला पाच वर्षे सुखाने सत्ता करू देणार नाही,” अशी वॉर्निंग देत जरांगे-पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना संध्याकाळपर्यंत ‘अल्टिमेटम’ दिला आहे.
“तोंड लपवू नका, मराठ्यांचा विरोधक कोण आहे, हे आम्हाला कळणे गरजेचे आहे,” असेही जरांगे-पाटील यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : रणजितसिंह मोहिते-पाटलांच्या अडचणीत वाढ, भाजप मोठी ‘अॅक्शन’ घेण्याच्या तयारीत