बीड : बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत मंत्री धनंजय मुंडे यांनी एक उपस्थित केलेल्या एका प्रश्नांवरून बाचाबाची झाल्याचा दावा खासदार बजरंग सोनवणे यांनी केला होता. मात्र, बैठकीत किरकोळ विषय होत असतात असं भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सांगितलं आहे. ते बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
सोनवणेंनी काय म्हटलं?
‘डीपीडीसी’च्या बैठकीत माजी पालकमंत्री ( धनंजय मुंडे ) म्हणाले, ‘दहशत आहे’ त्यावर ‘दहशत कुणाची आहे?’ याचे उत्तर द्या, असं मी म्हणाले. त्यानंतर माजी पालकमंत्र्यांनी ( धनंजय मुंडे ) म्हटलं, ‘इथे अधिकाऱ्यांवर दहशत आहे.’ तेव्हा थोडी बाचाबाची झाली, असं बजरंग सोनवणे यांनी सांगितलं.
हेही वाचा : 20 वर्षांत किती पैसा गोळा केला? मोदी सरकारच्या काळातील आकडा किती? ‘ईडी’नं दिला सगळा हिशेब
धनंजय मुंडे म्हणालेत का भांडण झाले?
सोनवणेंच्या वक्तव्याबद्दल सुरेश धस म्हणाले, “बाचाबाची हा किरकोळ विषय आहे. तेवढे विषय होत असतात. कुठलाही गट-तट नव्हता. एकामेकांना बोलल्यानं लगेच वादावादी होते का? भांडणे लावता का तुम्ही? हे भांडण गुद्द्याचे नाही, मुद्द्याचे भांडण आहे. धनंजय मुंडे म्हणालेत का भांडण झाले? नाही ना मग आम्हीही भांडण झाले असे म्हणणार नाही.”
देशमुख अन् मुंडे प्रकरणात नो कॉम्प्रोमाइज
“आम्ही संतोष देशमुख आणि महादेव मुंडे प्रकरणापासून अजिबात बाजूला हटणार नाही. त्याबाबत नो कॉम्प्रोमाइज,” असं धस यांनी ठामपणे सांगितलं.
मी लेखी पत्र देणार…
‘डीपीडीसी’च्या बैठकीत खर्च न झालेल्या पैशांबद्दल कुठलाही निर्णय झाला नाही. आष्टीतील जनावरांच्या दवाखान्यासाठी 50 लाख रूपये देण्याचा निर्णय झाला. बोगस पैसे उचलण्यात आले होते, हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर अजितदादांनी सांगितलं, संबंधित प्रकरणाचे लेखी पत्र द्यावे. मी संपूर्ण लेखी पत्र तयार केले आहे. बीड जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून कुठलेही काम न करता 73 कोटी बोगस उचलण्यात आले आहे. याची लेखी तक्रार मी केली नव्हती. आता मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे लेखी तक्रार करणार आहे. 73 कोटी बोगस उचलल्याप्रकरणी स्वतंत्र चौकशी केली जाईल.”
अजितदादांच्या पीएला पेनड्राईव्ह दिला
“मी अजितदादांचे पीए डिसलेंना पेनड्राईव्ह दिला आहे. नुसता पेनड्राईव्ह देऊन उपयोग नाही. याची लेखी तक्रार दिली जाईल. राज्याचे सचिव किंवा उपसचिव पदाचा एखादा अधिकारी चौकशी करण्यासाठी नेमला जाईल. पाच कोटी रूपये दोनदा उचलले आहेत, हे सरकारने मान्य केले आहे. एकूण 78 कोटी रूपयांचा घोटाळा झाला आहे. मी हा घोटाळा समोर आणल्यापासून जवळपास 500 लोक कोमा गेले आहेत,” अशी टिप्पणी धस यांनी केली. यानंतर एकच हशा पिकला.
पोलिसांनी राजीनामा देऊन वाळूंचे धंदे आणि गुंडाच्या टोळ्या काढाव्यात…
“बिंदू नामवलीचा माझा मुद्दा कायम आहे. ‘डीपीडीसी’च्या बैठकीत हा मुद्दा मांडला आहे. बिंदू नामवलीत अंतर्गत अतिरिक्त पोलीस अधिकारी झाले आहेत. एका पोलिसाने करूणा मुंडेंच्या कारमध्ये साड्या घालून पिस्तूल ठेवले. एका पोलीस अधिकाऱ्याकडे 100 टिप्पर आणि 15 जेसीबी आहेत. यात फक्त परळीचे पोलीस नाहीत. बीडमधील पोलिसांकडे सुद्धा स्वत:चे टिप्पर आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात जप्त केलेले टिप्पर पोलीस काढून नेतात. मग, पोलिसांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा देऊन वाळूचे धंदे करावेत, परळीतील काही पोलिसांनी सुद्धा राजीनामा देऊन गुंडांच्या टोळ्या काढाव्यात,” असं म्हणत धस यांनी सुनावले आहे.