घरमहाराष्ट्रगणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावरअवजड वाहतुकीस बंदी

गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावरअवजड वाहतुकीस बंदी

Subscribe

गणेशोत्सव काळात मुंबईतून कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांची संख्या लक्षात घेता कोल्हापूरमार्गे कोकणात जाणार्‍यांना टोल माफी जाहीर केली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने चाकरमान्यांचा प्रवास सुरळीत होण्यासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यानुसार, गणेशोत्सव काळात गणेशभक्तांना प्रवासात त्रास होऊ नये म्हणून मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाळू, रेती भरलेल्या ट्रक, मोठे ट्रेलर्स तसेच अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. या काळात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक मात्र सुरूच राहणार आहे.

गणेशोत्सव काळात मोठ्या संख्येने कोकणवासीय कोकणात जात असतात. सध्या मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे महामार्गावर जागोजागी अडथळे आहेत. अशा परिस्थितीत कोकणातील प्रवास सुरळीत व्हावा यासाठी राज्य सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्याअनुषंगाने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी महत्त्वपूर्ण घोषणा केली. दिवाकर रावते म्हणाले की, गणेशोत्सव काळात मुंबई परिसरातून कोकणात जाणार्‍या भक्तांची संख्या मोठी असते. या काळात एसटी महामंडळानेही कोकणातील विविध भागांत जाण्यासाठी जादा बसेसची व्यवस्था केली आहे. गणेशभक्तांचा हा प्रवास वाहतुकीच्या कोंडीशिवाय सुखकर आणि सुरक्षित व्हावा म्हणून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहतुकीस बंदी घालण्यात येत आहे.

- Advertisement -

मात्र दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, लिक्विड मेडीकल ऑक्सिजन, भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणार्‍या वाहनांना बंदी लागू नसेल. महामार्गाच्या रुंदीकरण तथा रस्ता दुरुस्तीच्या कामकाजाचे साहित्य, माल इत्यादीची वाहतूक करणार्‍या वाहनांनाही ही बंदी लागू नसेल. तथापि, या वाहतुकदारांनी संबंधित वाहतूक विभाग, महामार्ग पोलीस यांच्याकडून प्रवेशपत्र घेणे आवश्यक आहे. तसेच भारत सरकारच्या रासायनिक खते मंत्रालयाद्वारा जयगड पोर्ट येथे आयात केलेल्या युरियाच्या सुरळीत पुरवठ्याकरिता महामार्गावरील निवळी ते हातखंबा दरम्यानच्या युरिया खत वाहून नेणार्‍या वाहनांनाही वाहतूक बंदीतून वगळण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, गुरुवारी जाहीर केलेल्या निर्णयानुसार मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ (जुना रा. म. क्रमांक १७) वर ३० ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजेपासून ते २ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत, ७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून ते ८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत तसेच १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपासून ते १३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत या कालावधीत १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त वजनक्षमता असलेल्या (जड-अवजड वाहने, ट्रक, मल्टिएक्सल, ट्रेलर इत्यादी) वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद राहील.

- Advertisement -

तसेच ३ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर व ९ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर या कालावधीत महामार्गावर १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त वजनक्षमता असलेल्या (जड-अवजड वाहने, ट्रक, मल्टिएक्सल, ट्रेलर इत्यादी) वाहनांना सकाळी ८ वाजेपासून रात्री ८ वाजेपर्यंत वाहतुकीस पूर्णत: बंदी राहील. या कालावधीत नमूद वाहनांना रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत वाहतूक करण्यास परवानगी राहील. तर ३० ऑगस्ट रोजी रात्री १२.०१ वाजेपासून ते १३ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत महामार्गावर वाळू, रेती व तत्सम गौणखनिजांची वाहतूक करणार्‍या वाहनांना पूर्णत: बंदी राहील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -