गेल्या दोन दिवसांत दोन राजकीय नेत्यांवर हल्ला झाल्याने सध्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. मंगळवारी (ता. 7 फेब्रुवारी) वैजापूर येथे ठाकरे गटाचे युवाप्रमुख आदित्य ठाकरे आणि बुधवारी (ता. 8 फेब्रुवारी) विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करण्यात आला. यानंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. तसेच असे हल्ला करणाऱ्या मास्टरमाईंडला शोधून त्यांच्या कडक शासन करण्याची मागणी त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याच्याकडे केली आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर झालेला भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो. मला सकाळी मीडियाकडून या घटनेची माहिती मिळाली. राजीव सातव यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव यांनी यशस्वीपणे सर्व जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्या राजीव सातव यांचा राजकीय वारसा चांगल्या पद्धतीने पुढे नेण्याचे काम करत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे काम करत असताना जर कोणी भ्याड हल्ला करत असले तर ते पूर्णपणे निषेधार्ह आहे. आपण महिलांना मान, सन्मान, प्रतिष्ठा देतो. राजकारणात वेगवेगळी मते असू शकतात. पण असे हल्ले होणे चुकीचे आहेत.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी झालेल्या आदित्य ठाकरेंवरील हल्ल्याचा देखील मी निषेध केला होता. खरं तर प्रत्येकाची सुरक्षा करणं ही राज्य सरकार आणि पोलीस खात्याची जबाबदारी असते. तसेच एखादा आमदार, खासदार लोकप्रतिनिधी असल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी याप्रकरणात तातडीने लक्ष घालणे महत्वाचे आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री या नात्याने ताबडतोब माहिती घेऊन राजकीय नेत्यांना बंदोबस्त दिला पाहिजे. तर यामागील मास्टरमाईंडला शोधून त्याच्यावर कडक शासन झाले पाहिजे. जेणेकरून यापुढे असे कोणी काहीही करताना कठोर शिक्षा होण्याच्या भीतीने कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करता कामा नये, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
हेही वाचा – …तर मी आमदारकीचा राजीनामा देईन; हसन मुश्रीफ आक्रमक
दरम्यान, लोकशाहीमध्ये सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधी पक्षाला देखील महत्वाचे स्थान असते. त्यामुळे विरोधकांना सुद्धा काम करताना सुरक्षित वाटणे गरजेचे आहे. त्यामुळे विरोधकांना सुद्धा संरक्षण मिळाले पाहिजे, असेही अजित पवार यांनी सांगितले.