मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे. नव्या प्रकरणांची नोंदही आटोक्यात आली आहे. यामुळे मुंबईत लॉकडाऊनच्या निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. परंतु मुंबईकरांनी स्वयंशिस्तीनं कोरोना नियमांचे पालन करावं असे मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या जरी कमी झाली असली तरी कोरोना संकट अजूनही आहे. मुंबईकरांना बेस्टमध्ये पुर्ण आसनक्षमतेने प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. तर लोकलमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
मुंबईत ब्रेक द चेनअंतर्गत लॉकडाऊन करण्यात आला होता यामध्ये आता शिथिलता देण्यात आली आहे. राज्यात एकूण ५ टप्प्यात लॉकडाऊन शिथिल केला आहे. यामध्ये मुंबई तिसऱ्या टप्प्यात आहे. यामुळे मुंबईत ४ वाजेपर्यंत दुकाने सुरु राहणार असून यानंतर संचारबंदी आणि जमावबंदी लागू होणार असल्याचे मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या साथीचा सामना करता करता पावसाळ्यातील आजारांचाही सामना करावा लागणार आहे. त्यामुळे मुंबईतील तसेच सर्वच नागरिकांनी पाणी उकळून आणि गाळून घेऊन पिण्यासाठी वापरावे असेही आवाहन मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.
कोरोनाला तालुका आणि जिल्ह्याच्या वेशीवर रोखण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न केला पाहिजे. सर्वच नागरिकांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी प्रमाणेच माझा जिल्हा माझी जबाबदारी असे धोरण अवलंबले पाहिजे असे केल्याने कोरोनाला रोखण्यास मदत होईल आणि पुर्वीप्रमाणे सर्व सुरळीत सुरु होईल असे पेडणेकर यांनी म्हटले आहे. मुंबईतील बेस्ट सेवा पुर्ण आसन क्षमतेने धावणार आहे. तर एसटी वाहतूक अजूनही बंद ठेवण्यात आली असल्याचेही पेडणेकर यांनी सांगितले आहे.
मुंबईत काय राहणार सुरु?
अत्यावश्यक दुकाने आणि आस्थापना दुपारी ४ वाजेपर्यंत दररोज सुरु राहतील
केमिस्ट आणि मेडिकल दुकाने सर्व दिवस २४ तास खुली ठेवण्यास परवानगी
आवश्यकतेतर दुकाने आणि आस्थापना सोमवार-शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील
उपहारगृह सोमवार-शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु, ‘टेक अवे’ आणि ‘होम डिलिव्हरी’ सुरु
सार्वजनिक ठिकाणे पहाटे ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत सुरु
क्रीडांगण पहाटे ५ ते सकाळी ९ आणि सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरु
लग्न सोहळ्यात ५० व्यक्ती आणि अंत्यसंस्कारला २० व्यक्तींच्या हजेरीस परवानगी
केवळ बांधकामाच्या ठिकाणी राहणाऱ्या कामगारांना परवानगी, इतर कामगारांना दुपारी ४ पर्यंत काम करण्याची परवानगी
सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी आणि सायंकाळी ५ नंतर संचारबंदी
व्यायामशाळा, सलून, ब्युटी सेंटर आणि स्पा ५० टक्के क्षमतेसह दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु
खासगी कार्यालये दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु
शासकीय आणि खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेसह कार्यान्वित
स्थानिक आणि सहकारी संस्थांच्या सभा आणि निवडणुका ५०% क्षमतेसह सुरु
सामाजिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम ५० टक्क्यासह सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ पर्यंत सुरु
कृषीसंबंधी कार्य दररोज दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु
लोकल रेल्वे वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठी सुरु
सार्वजनिक बेस्ट बस सेवा १०० टक्के सुरु (उभे राहून प्रवास करण्यास परवानगी नाही)
कार्गो वाहतूक सुरु (केवळ ३ व्यक्ती-वाहनचालक आणि इतर कर्मचारी)
आंतरजिल्हा वाहतूक ५ व्या स्तरातील जिल्ह्यातून वाहन जाणार नसल्यास प्रवास करण्याची परवानगी
ई-कॉमर्स सुरु
मुंबईत काय बंद?
मॉल, चित्रपटगृह, नाट्यगृह बंद
शूटिंगला सायंकाळी ५ नंतर बाहेर जाण्यास परवानगी नाही