शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. कारण २०१४च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवल्याचा आरोप बच्चू कडूंवर करण्यात आला आहे. अमरावतीच्या चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. २५ हजार रुपयांचा दंड आणि दोन महिन्यांचा सश्रम कारावास सुनावल्यामुळे बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान बच्चू कडूंच्या विरोधात भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज न्यायालयाने निकाल दिला आणि बच्चू कडू यांना सश्रम कारावास सुनावला आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर आता याचिकाकर्ते गोपाल तिरमाने यांनी बच्चू कडू यांचे विधानसभा सदस्यपद रद्द करा, अशी मागणी करत आहेत. याप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या चुकीच्या निकालाचे बच्चू कडू यांनी स्वागत केले असून वरच्या न्यायालयात धाव घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच याप्रकरणी त्यांनी जामीन मिळाल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
बच्चू कडू काय म्हणाले?
बच्चू कडू म्हणाले की, ‘एक आमदारांची सोसायटी केली होती. त्यावेळेस त्या सगळ्या आमदारांना शासनाने घरासाठी कर्ज दिले होते. आता त्याच घरावर आपण कर्ज काढलं आणि त्याच्यामुळे कर्जाची रक्कम त्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्जात टाकली गेली. नेमका घराचा क्रमांक टाकला गेलाा नाही एवढीच त्याच्यातली चूक आहे. आपण कर्जाचे घर दाखवले आहे. पण न्यायालयाने आता जो चुकीचा निर्णय दिला त्याचे आम्ही स्वागत करतो. या घटनेत असे आहे की, ‘अचलपूरला ही संपूर्ण घटना घडली. तक्रार करणारा हा चांदूरबाजाराचा होता. त्याने आसेगाव येथे तक्रार दाखल केली. ज्या ठाणेदाराने गरिब लोकांना २० हजार रुपये घेऊन लुबाडले होते. त्या ठाणेदाराला आमच्या पद्धतीने आम्ही सबक दिला होता. त्यामुळे त्याने तो डाव काढला आणि आसेगावला त्याने तक्रार केली. दुसरा एक विरोधी पकडला आणि अशातून ही केस निर्माण केली. त्यामध्ये दोन महिन्यांचा कारावास आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. याच्याने काही होणार नसून आम्ही वरच्या न्यायालयात जाणार आहे. वरचे न्यायालय आम्हाला न्याय देईल असा मला विश्वास आहे.’
हेही वाचा – Kirit Somaiya Pune : सोमय्यांचा सत्कार अन् मनपा पायऱ्यांचे गोमुत्राने काँग्रेसकडून शुद्धीकरण