जळगाव – 50 पैकी चाळीस आमदार आणि 18 पैकी 12 खासदार शिंदे गटात गेले. यांच्याकडे काहीच शिल्लक राहिले नसल्याची टीका मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनेवर केली. पुढे त्यांनी आता शिवसेना भवनासाठी मारामाऱ्या होतील, असेही म्हंटले आहे. ते जळगावात एका कार्यक्रमात बोलत होते.
शिवसेनेवर मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले –
अडीच वर्षांचा आमचा काळ फुकट गेला. आमच्या पाठीशी शिवसेनेनंच खंजीर खुपसला. आमच्याशी गद्दारी करुन राष्ट्रवादी, काँग्रेसला जाऊन मिळाले. मात्र, याचे फळ शिवसेनेला मिळाले आहे. त्यांचे 50 पैकी चाळीस आमदार गेले, 18 पैकी 12 खासदार गेले. आता त्यांच्याकडे काहीच शिल्लक राहिलेले नाही. आता नावासाठी, चिन्हासाठी भांडत आहेत, परवा मैदानासाठी भांडत होते, आता काही दिवसांनी शिवसेना भवनसाठी मारामाऱ्या होतील, अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाणचा मला तालुक्यातील अनुभव –
यावेळी बोलताना ते म्हणाले की, लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाणचा अनुभव हागणदारी वरून मला आला आहे. या विषयावर आपली मोठी कोंडी झाल्याचे महाजन यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, मी ग्रामविकास मंत्री आहे. राज्यात मी सगळीकडे हागणदारी मुक्तीबद्दल लोकांना हगणदारीमुक्त गावं करा, रस्त्यावर कुणीही शौचास बसून नका, याबाबत सांगत असतो. मात्र, माझ्याच तालुक्यात केकतनिंभोरा या गावात रस्त्यालगत एक, दोन नव्हे 50 लोक रस्त्यालगत बसलेले दिसले, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.
पुढे त्यांनी माझ्या तालुक्यातच जर अशी परिस्थती आहे, तर मी इतरांना काय सांगेन, म्हणून माझी हातू जोडून सर्वांना विनंती आहे, उघड्यावर शौचास बसू नका, हे थांबविण्यासाठी यापुढे मी गांधीगिरी करणार असून रस्त्यावर बसणाऱ्या लोकांना गुलाबपुष्प देणार आहे, असे ते म्हणाले.